कल्याण: आपल्या देशात राजकीय चर्चा होऊन वादावादी होण्याचे प्रकार काही नवीन नाहीत.या वादावादीतून काहीवेळी तणावही निर्माण होतो. पण वादावादीचं रुपांतर हाणामारीत झाल्यास मात्र परिस्थिती काहीशी गंभीर बनते. अशीच एक घटना कल्याणमध्ये घडली असून राजकीय वादावादी झाल्यानंतर एकाने दुसऱ्याच्या डोक्यात थेट कुकरचं झाकणच घातला. 


देशातील आणि राज्यातील  राजकारणात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर सध्या चौका-चौकात चर्चा सुरू असल्याचे दिसून येतेय. मात्र या चर्चामधून होणारे वाद आता मित्रांतील हाणामाऱ्यापर्यंत पोहचल्याचे कल्याणमध्ये घडलेल्या घटनेत दिसून आलं आहे. कल्याणमधील भांडी विक्रीच्या दुकानात देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा सुरु होती. ही चर्चा इतक्या विकोपाला गेली की, एका दुकानातील कामगाराने दुसऱ्या दुकानातील कामगाराला कुक्करचं छाकणच फेकून मारले. या घटनेत धीरज पांडे नावाचा कामगार तरुण जखमी झाला आहे. हल्ला करणारा दुसरा कामगार मनिष गुप्ता याच्या विरोधात गुन्हा दाखल करीत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 


आजकाल ठिकठिकाणी राज्यातील आणि देशातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडीवर चर्चा सुरु असते. चर्चेदरम्यान तर्क विर्तक ओढवले जातात. मात्र लोकांची सहनशीलता कमी होत चालली आहे. त्याचाच परिमाण असा होत आहे की, चर्चेमध्ये वाद होतो. या वादाचे रुपांतर हाणामारीत होते. कल्याण पश्चिमेतील बाजार पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भांडी विक्रीच्या बाजारपेठेत एका दुकानात राजकीय चर्चा सुरु होती. देशावर किती कर्ज आहे, बजेट काय मांडले आहे, नेमकी काय परिस्थिती आहे यावर ही चर्चा सुरु होती. धीरज पांडे नावाचा तरुण काही जणांसोबत चर्चा करीत होता. या चर्चेत शेजारच्या दुकानातील कामगार मनिष गुप्ता हा देखील सहभागी झाला होता. 


धीरजने जो मुद्दा चर्चेच्या दरम्यान उपस्थित केला तो मनिषला पटला नाही. त्यातून या दोघांमध्ये वादावादी झाली. मनिषने थेट कूकरचे झाकण उचलून धीरजच्या डोक्यावर मारले. यात धीरज पांडे हा जखमी झाला. बाजारपेठ पोलिसांनी हल्ला करणाऱ्या मनिष गुप्ताला ताब्यात घेतले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :