भिंवडी :  डोंबिवलीमध्ये केमिकलच्या (Dombivli Blast)  कंपनीत मोठा स्फोट  झाल्याने अनेकांचे मृत्यू झाल्याची दुर्दैवी अशी घटना घडली होती आणि प्रशासनाने तात्काळ कारवाईचे निर्देशही दिले. परंतु भिवंडीकडे (Bhiwandi)  मात्र प्रशासनाचे अजूनही दुर्लक्ष होत आहे. भिवंडी ग्रामीण भागात देखील अनधिकृतपणे अनेक ठिकाणी केमिकल साठा मोठ्या प्रमाणात साठवण्यात आला आहे. यावर प्रशासन कधी कारवाई करेल असा प्रश्न नेहमी असतो. डोंबिवलीसारखी मोठी घटना घडल्यानंतर प्रशासन भिवंडी कडे लक्ष देईल का असा सवाल जनतेचा आहे.  


भिवंडी तालुक्यातील कटाईबाग परिसरात केमिकलचे अनेक गोदाम आहेत या अनधिकृत कंपनीमध्ये काम करीत असताना दोन ते तीन कामगार भाजल्याने जखमी झाले आहेत. कटाई गावचे सरपंच छाया पाटील व माझी सरपंच शरद पाटील यांनी पोलिस व ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थाळीची पाहणी करत हे अनाधिकृत केमिकल साठाचे गोदाम तात्काळ बंद करण्यात यावे यासाठी प्रशासनाकडे विनंती केली आहे. तर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे देखील केली आहे. 


नागरिकांच्या जीवाशी खेळ


कटाई ग्रामपंचायत हद्दीतील अनाधिकृत केमिकल गोदामामुळे गावात संपूर्ण दुर्गंध पसरली आहे तसेच अनेकांना आजार देखील होत आहे. नदीकिनारी या केमिकल साठ्यांचे मोठ्या प्रमाणात साठवण केली जात आहे . केमिकल वाहतूक करताना देखील केमिकल रस्त्यावर पडल्याने धूर निघतो. तसेच या केमिकल ड्रम मधून वाफा देखील निघत आहेत त्यामुळे या परिसरात कधीही मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गावातील वीस हजार जनसंख्या असलेले नागरिकांच्या जीवाशी  अक्षरशः खेळ खेळला जात आहे.


गोदाम बंद पाडण्याचा ग्रामस्थांचा इशारा


 प्रशासनाने जर या ठिकाणी लवकरात लवकर कारवाई केली नाही तर भिवंडीची डोंबिवली झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या ठिकाणी अनाधिकृत केमिकल साठ्यांवर प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे जर कारवाई झाली नाही तर ग्रामस्थ स्वतः रस्त्यावर उतरून केमिकल गोदाम बंद पाडतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


हे ही वाचा :


मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार