Whats App Down: मोबाइलधारकांसाठी अत्यावश्यक असलेली मेसेंजर सेवा व्हॉट्सअॅपची सेवा ठप्प (Whats App Down) पडली आहे. अनेक ठिकाणी युजर्सना अडचण जाणवत आहे. मेटा कंपनीकडून या तांत्रिक समस्येबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. मात्र, सेवा पूर्ववत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे.
दुपारी 12.30 वाजण्याच्या आसपास व्हॉटस अॅपवरून युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या. सुरुवातीला इंटरनेटची समस्या असू शकते असे अनेकांना वाटत होते. मात्र, इतर संकेतस्थळे सुरू असताना फक्त व्हॉट्सअॅपवरून मेसेज जात नसल्याने युजर्स गोंधळात पडले. त्यानंतर सोशल मीडियावर युजर्सकडून तक्रारींचा पाऊस पडू लागला. काही वेळेत ट्वीटरवर #WhatsAppDown चा ट्रेंड सुरू झाला. व्हॉट्सअॅपची मालकी असणाऱ्या मेटा कंपनीकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
Downdetector ने दिलेल्या माहितीनुसार, 69 टक्के युजर्सना मेसेज करण्यात अडचणींना सामोरे जावे लागले. तर, 21 टक्के युजर्सकडून इंटरनेट कनेक्शनबाबत समस्या जाणवत होती. तर, 9 टक्के युजर्सना इतर समस्या जाणवत होत्या. सुरुवातीला, व्हॉट्सअॅपमधील ग्रुपमध्ये मेसेजचे आदान-प्रदान करण्यात युजर्सना अडचणी जाणवत होत्या. त्यानंतर वैयक्तिक मेसेजही पाठवण्यास अडचणी येऊ लागल्या.
अनेकजण मेसेजिंग, महत्त्वाच्या फाईल्स ट्रान्सफर करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅप हा अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग झाला आहे. व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याने कोट्यवधी युजर्सना त्याचा फटका बसला आहे.
मागील वर्षी देखील फेसबुकच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने WhatsApp ची सेवा ठप्प पडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा WhatsApp डाऊन झाले आहे.
ट्वीटरवर युजर्सकडून याबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत आहे. WhatsApp चा सर्व्हर क्रॅश झाल्याने सेवा खंडीत झाल्याचा दावा करण्यात येत आहे. युजर्सकडून इतर मेसेजिंग अॅपचा वापर करण्यात येत आहे.
सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
#WhatsAppDown च्या ट्रेंडसह युजर्सकडून मिम्सचा वर्षाव सुरू आहे. व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यानंतर युजर्सकडून मिम्स व्हायरल करण्यात येत आहेत.
अनेकांकडून टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या मेसेजिंग अॅपचा वापर करण्याचा आग्रह धरला आहे. व्हॉट्सअॅपने काही महिन्यांपूर्वी आपल्या पॉलिसीमध्ये बदल केला होता. त्यातील प्रीव्हेसीच्या मुद्यांवरून युजर्सकडून व्हॉटसअॅपला विरोध करण्यात आला होता. त्यावेळी सिग्नल आणि टेलिग्रामच्या वापराचा आग्रह धरण्यात येत होता.