मुंबई : कीटकनाशकांची फवारणी करताना विदर्भात 18 शेतकऱ्यांचा विषबाधा होऊन मृत्यू झाला. या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.


एबीपी माझाने याबाबत सर्वप्रथम वृत्त देऊन पाठपुरावा केला होता. फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्यामुळे विषबाधा होऊन 18 शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. तर 546 शेतकरी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

कपाशी आणि सोयाबीनवर पावसाचा मोठा खंड पडल्याने किडींचा मोठ्या प्रमाणात पादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी जहाल कीटकनाशके पिकांवर फवारणी करत आहेत. मात्र फवारणी करताना शेतकरी योग्य ती काळजी घेत नसल्याने विषबाधा होत आहे.

विदर्भातील जिल्हानिहाय परिस्थिती

  • यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करताना 369 शेतकऱ्यांना विषबाधा झाली, तर 7 जणांनी जीव गमावला.

  • अकोला जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 100 रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं लागलं. त्यातील 5 शेतकऱ्यांचा विषबाधा झाल्याने मृत्यू झाला.

  • बुलडाणा जिल्ह्यात 52 शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा झाली.

  • वर्धा जिल्ह्यातही 22 रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करावं लागलं.

  • गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात काही शेतकऱ्यांना धानावर किटकनाशक फवारताना 3 शेतकऱ्यांना विषबाधा झाली.


फवारणी करताना काय काळजी घ्याल?

फवारणी करताना तोंडाला कापड लावलं तर श्वास घेता येत नाही. बूट घातले तर वजन घेऊन चालत येत नाही, त्यामुळे अशी काळजी घेतली नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उलटी, मळमळ, चक्कर येणे हा त्रास सुरू होतो.

शेतकरी अनेकदा दिवसभर तापत्या उन्हात काम करतात. कीटकनाशकाचे डब्बे सुरक्षित ठिकाणी जमिनीत टाकून नष्ट करावेत, फवारणी करताना वाऱ्याची दिशा पाहावी, कीटकनाशक जमिनीवर आणि गवतावर सांडू देऊ नये, फवारणी केल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावे, कोट, हातमोजे, टोपी, डोळ्यांसाठी गॉगल या साहित्याचा वापर करावा, फवारणी करताना कीटकनाशकाची मात्रा न घेता नेमून दिलेल्या मापानुसार कीटकनाशक फवारावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत..

ही सर्व आकडेवारी सराकरी रुग्णालयांमधील आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही हजारो शेतकरी उपचार घेत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने जागरूकता मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.

संबंधित बातमी : फवारणी करताना विदर्भात 18 जणांचा मृत्यू, तर 546 शेतकरी व्हेंटिलेटरवर