सोलापूर : गेल्या वर्षीच्या तीव्र दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर यंदा उजनी धरण (Ujani dam) भरणार का याची काळजी सर्वांनाच लागली होती, आता उजनी तुडुंब भरू लागले असून येणाऱ्या पाण्याची अवाक 1 लाख क्युसेक पर्यंत जाऊ लागल्याने आज सायंकाळी धरणातून तब्बल 20 हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. भीमा नदीत (Bhima river) हा विसर्ग सोडण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून व्यास नारायण वसाहतीमधील 500 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. आज सकाळी उजनी धरणाने 90 टक्क्यांची पातळी गाठली असताना वरुन धरणाकडे येणाऱ्या पाण्याची (Water) अवाक 1 लाख क्युसेक पर्यंत पोहोचल्याने धरण प्रशासनाने धरणातून सुरुवातीला 20 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पाण्याची पातळी वाढल्याने आता 40 हजार क्यूसेक गतीने पाणी नदी पात्रत सोडले जाणार आहे. 


एका बाजूला उजनी धारण ओव्हरफ्लो होत असताना सातारा जिल्ह्यातील वीर धरणातूनही नीरा नदीत 42 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या नीरा नरसिहपूर येथे भीमा आणि नीरा नदीचा संगम होऊन हे सर्व पाणी पंढरपूरकडे येत असते. सध्या याच वीर धरणातून सोडलेल्या पाण्याने भीमा दुथडी भरून वाहत असताना आता यात उजनी धरणाचे पाणी येण्यास सुरुवात झाल्यास पंढरपूरचा पुराचा धोका वाढणार आहे.पुणे आणि सातारा जिल्ह्यात असाच पाऊस सुरू राहिल्यास पुढच्या दोन दिवसात पंढरपूर शहर व नदीकाठच्या गावांना पुराचा तडाखा बसणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाही अलर्ट मोडवर आहे.  
      
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेले उजनी धरण 100 टक्के भरल्याने आता सोलापूर जिल्ह्यासह , नगर , उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील अनेक भागाचा पिण्याच्या  शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे . उजनी धरणाची एकूण क्षमता 117.23 TMC  असून  यात  जिवंत साठ्यात 53.57 TMC तर मृत साठ्यात 63.66 TMC पाणी साठवता येते. यावर्षी धरणाने नीचांकी पातळी गटात वजा 60 टक्के एवढी पातळी गाठली होती. मात्र, जून महिन्यापासूनच पुणे जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसाने आज 4 ऑगस्ट रोजी धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली आहे. अजूनही उजनी पाणलोट क्षेत्रात 2 महिने पावसाचा कालावधी असताना ऑगस्टमध्येच पूरस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येणार असल्याचे दिसून येते. उजनी धरणात पूर नियंत्रणासाठी 110 टक्के पाणी साठविण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याने 123 TMC पर्यंत पाणी धरणात साठवता येवू शकते. मात्र, सध्या ज्या प्रमाणात उजनी धरणात पाणी येऊ लागले आहे हे पाहता प्रशासनाने आजपासून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे . दरम्यान, मागच्या वर्षी उजनी आजच्या तारखेला 5 टक्के भरले होते, आज 89 टक्के भरले आहे. 


500 लोकांना सुरक्षितस्थळी हलवले


वीर आणि उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात केल्याने पंढरपूर शहरातील व्यास नारायण वसाहतीतील 500 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास प्रशासनाने केली सुरुवात आहे. आज रात्रीपासून पुन्हा चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार असल्याने व्यास नारायण भागातील घरात पाणी शिरणार असल्याने येथील कुटुंबीयांना प्रशासनाने स्थलांतरित करण्यात येत आहे. 


उजनी धरण 91 टक्के भरले


उजनी धरणाचे 16 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडले असून उजनी धरणातून भीमा पात्रात 21 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला. मात्र, रात्री 8 नंतर 40 हजार क्युसेकने हा विसर्ग करण्यात येत आहे. उजनी धरण 89 टक्क्यापेक्षा अधिक भरलं असून भीमा काठाच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनी धरण सध्या 91 टक्के इतकं भरलं असल्याने उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये सायंकाळी 5 पाच वाजल्यापासून 21 हजार 600  क्युसेक इतका विसर्ग सुरु करण्यात आला होता. दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणाच्या भीमा नदी पात्रात 95 हजार 200 क्युसेक इतका विसर्ग येत असल्याने उजनी धरण व्यवस्थापनाने हा निर्णय घेतलाय. उजनी धरणाचे 16 दरवाजे हे 40 सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत. उजनी धरण हे एकूण 117 टीएमसी क्षमतेचा असून सध्या उजनी धरणात 111 पूर्णांक 77 टीम्स इतका पाणीसाठा झाला आहे.