सोलापूर : माढा तालुक्यातील शेवरे येथे जमिनीच्या तुकड्यासाठी चुलत्याचा कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण खून (Murder) करून मुंडके दुचाकीवर घेऊन फिरणाऱ्या नराधमास न्यायालयाने 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील दुसरा आरोपी असणाऱ्या त्याच्या भावालाही पोलिसांनी आज अटक केली असून, त्याला देखील 6 दिवसांचीच पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सोलापूर (Solapur) जिल्हा हादरवून सोडणाऱ्या या धक्कादायक प्रकारामुळे जमिनीच्या तुकड्यासाठी किती टोकाचे वाद होऊ शकतात हे महाराष्ट्राला पाहायला मिळाले. 


जमिनीच्या वादातून वृद्ध चुलत्याचा सावत्र पुतण्याकडून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, हत्या करून धडावेगळे केलेले मुंडके घेऊन आरोपी गाडीवरून फिरत होता. याचवेळी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे. शंकर प्रल्हाद जाधव (वय 65 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, या प्रकरणी शिवाजी बाबासाहेब जाधव, परमेश्वर बाबसाहेब जाधव, आकाश बाबासाहेब जाधव आणि अजित बाबासाहेब जाधव यांच्या विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोनही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यान 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


मुंडके घेऊन दुचाकीवरून फिरत होता...


अधिक माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील शेवरे या गावात शंकर जाधव हे राहत होते. त्यांचा सावत्र पुतण्या शिवाजी जाधव याच्याशी जमिनीच्या तुकड्यावरून वाद सुरु होते. सोमवारी सकाळी अकरा वाजता अशाच पद्धतीने पुन्हा वाद झाल्यावर, पुतण्या शिवाजी बाबासाहेब जाधव याने कुऱ्हाडीने चुलत्याची मुंडके छाटून हत्या केली. धक्कादायक म्हणजे चुलत्याची हत्या केल्यावर त्यांचे धडावेगळे केलेले मुंडके घेऊन शिवाजी हा दुचाकीवरून परिसरात फिरत होता. 


स्वतः पोलिसांना शरण आला.... 


पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीचा शोध सुरु केला. तर, पोलीस मागे लागले असल्याचे कळताच घाबरलेल्या शिवाजीने आपली दुचाकी अकलूजच्या दिशेने वळवली. तसेच, आता पोलीस आपल्याला पकडतील याची जाणीव होताच तो अकलूजच्या दिशेने निघाला. तसेच दुचाकी आणि सोबत आणलेल्या चुलत्याचे मुंडकं घेऊन शिवाजीने अकलूज पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसमोर शरणागती पत्करली. यानंतर अकलूज पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन मुंडके आणि दुचाकी हस्तगत केली. 


नेमकं काय घडलं? 


दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी शिवाजी जाधव, आकाश जाधव या दोन्ही भावांना अटक केली आहे. तसेच, दोन आरोपी अजूनही फरार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात जमिनीच्या वादातून चुलते आणि पुतणे यांच्यात न्यायालयात देखील केस सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शिवाजी व त्याचे तीन भाऊ मयत शंकर जाधव यांच्या घरात घुसले. यावेळी घरातील सर्व मंडळी शेतात कामाला गेली होती. शंकर जाधव यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्याने ते एकटेच घरात झोपले होते. शिवाजी व त्याच्या भावांनी घरात घुसून चुलत्याला पकडले आणि शिवाजीने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून मुंडके धडावेगळे केले. यानंतर शिवाजी ते मुंडके घेऊन दुचाकीवर निघून गेला. 


न्यायालयाने 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली...


शिवाजीला अकलूज येथे अटक केल्यावर त्याचा दुसरा भाऊ आकाश याला पोलिसांनी गावाजवळ पकडले आहे. दरम्यान, आरोपीना अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्यामुळे पोलिसांसमोर पेच उभा राहिला होता. मात्र, पोलिसांनी समजूत घातल्यावर 28 तासांनी  शंकर प्रल्हाद जाधव यांच्यावर अंत्यसंकार करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवाजी आणि त्याचा भाऊ आकाश याला माढा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश जोग यांनी सांगितले. या प्रकरणात फरार असलेले शिवाजीचे दुसरे दोन भावांचा तपासासाठी पोलिसांनी 6 ठिकाणी पथके पाठविली असून, तातडीने उर्वरित आरोपीना जेरबंद करू असे गिरीश जोग यांनी सांगितले.


संबंधित बातमी: 


चुलत्याचं मुंडकं घेऊन बाईकवरुन फिरला, नंतर पोलिसांना शरण, माढा हादरलं