Maharashtra Politics : सध्या काय डोंगार, काय झाडी; असं म्हणत लोकप्रियतेच्या शिखरावर असणारे शिंदे गटाचे फायरब्रॅन्ड आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांना रोखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून व्यूहरचना लावली जात आहे. असं असलं तरी शहाजीबापू यांना खरी झुंझ शेकापचा तरुण नेता डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याशी द्यावी लागणार आहे. सांगोल्याचे भाग्यविधाते अशी ओळख असणारे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू असणारे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यात सध्या शेकाप कार्यकर्ते गणपतरावांचे रूप पाहू लागले आहेत. गेल्यावेळी डॉ. बाबासाहेब यांचे तरुण बंधू डॉक्टर अनिकेत यांचा अतिशय निसटत्या मतानं पराभव शहाजीबापू पाटील हे आमदार झाले होते. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटात प्रवेश करून आपल्या जोरदार वक्तव्याच्या जोरावर मातोश्रीवर जोरदार हल्ले चढविल्यानं ते सध्या संपूर्ण देशभर चर्चेत आहेत. 


गणपतराव यांच्या निधनानंतर डॉ. बाबासाहेब देशमुख हे कलकत्ता येथून सांगोल्यात आले आणि गणपतरावांच्या पद्धतीने आपल्या कामाला सुरुवात केली. कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख महाराष्ट्राच्या विधानसभेतील भीष्माचार्य म्हणून ज्यांची ओळख असणाऱ्या स्वर्गीय आमदार भाई डॉ. गणपतराव देशमुख तथा आबासाहेब यांचे नातू असणारे डॉ. बाबासाहेब पोपटराव देशमुख हे पाहिल्यापासून राजकारणापासून दूर राहिले होते. डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा जन्म 3 जानेवारी म्हणजे, सावित्रीमाई फुले यांच्या जन्मदिनी पेनूर तालुका मोहोळ येथे झाला. प्राथमिक शिक्षण पेनुर येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीपर्यंत झाले. पाचवी नंतरचे  माध्यमिक शिक्षण तुळजाभवानी सैनिक विद्यालय तुळजापूर, तर अकरावी , बारावीचे शिक्षण लातूर येथील दयानंद कॉलेज मधून पूर्ण केले .  बारावीत मिळालेल्या गुणांवर  औरंगाबाद येथील शासकीय मेडिकल कॉलेज येथे एम.बी.बी.एस. ला अ‍ॅडमिशन घेऊन येथे ते डॉक्टर बनले .  वर्षभर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून रुग्णांची सेवा केली. त्यानंतर 'जनस्वास्थ सहयोग' गनियारी (बिलासपुर छत्तीसगढ) या सेवाभावी संस्थेत दीड वर्षाहून अधिक काळ आदिवासी बांधवांची सेवा केली. यानंतर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथे एम.डी. (मेडिसिन) पूर्ण केलं.


रवींद्रनाथ टागोर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियाक सायन्स कलकत्ता या एनजीओ संस्थेत डॉ. अभय बंग व राणी बंग यांच्या मार्गदर्शनाखाली डी.एन.मिल. हा तीन वर्षाचा कोर्स करीत असताना (कोविड-19 च्या काळात) जवळजवळ पाच हजाराहून अधिक लोकांची अँजिओप्लास्टी आणि पेसमेकर बसवण्याचे यशस्वी काम केले. एम.डी. करत असताना नॅशनल लेवलचे दोन पेपर प्रसिद्ध केले. तसेच इंटरनॅशनल जर्नल मध्ये तीन पेपर प्रसिद्ध केले. दक्षिण कोरियामध्ये भरलेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये 2021 मध्ये पेपर प्रेझेंट केला. तसेच 2019 मध्ये कलकत्ता येथे उद्भवलेल्या वादळात आदिवासी बांधवांना मदत कार्य करण्यात सक्रिय सहभाग घेतला होता . 


तब्बल 55 वर्षे सांगोला विधानसभा मतदारसंघात शेकापच्या चिन्हावर आमदारकी जिंकणारे स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचे निधन दिनांक 30 जुलै 2021 रोजी झाले आणि डॉक्टर बाबासाहेब यांनी सांगोला येथे आपला मुक्काम हलवला. अतिशय बुद्धिमान, शांत, समाजात एकजीव होणार हा तरुण गणपतराव यांच्या सर्व स्तरातील नेते आणि कार्यकर्त्यांना भावला. इथूनच सांगोल्याचा विजेचा प्रश्न असो अथवा पाण्याचा त्यांनी घेतलेल्या सर्व आंदोलनाला हजारोंच्या संख्येने शेकाप कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. उच्यशिक्षित असणारे डॉ. बाबासाहेब देशमुख यामुळेच सांगोला मतदारसंघात अल्पावधीत लोकप्रिय नेतृत्व म्हणून समोर आले. 


त्यांना खेळाची विशेष आवड आहे. सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना 17 वर्षाखालील गटात हॉलीबॉलचे चॅम्पियनशीप आणि एम.बी.बी.एस. करीत असताना राज्यस्तरीय व्हॉलीबॉल चॅम्पियन होते. त्यांच्या लोकप्रियतेची दखल शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी  घेतली. यातूनच भाई जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब यांची पुरोगामी युवक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी आणि राज्य चिटणीस मंडळाच्या सदस्यपदी निवड केली. आता येणारी नगरपालिका निवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचा 'लाल बावटा' पुन्हा फडकवण्याचा निर्धार डॉक्टर बाबासाहेब यांनी केल्यानं शहाजीबापू पाटील यांना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत नाही तर फक्त शेकापशी झुंजावं लागणार आहे. तसंही सांगोल्यात शिवसेनेचं ही सांगोल्यात नगण्य स्थितीत आहे, तर राष्ट्रवादी गेल्यावेळी शहाजीबापू यांच्याच सोबत राहिल्यानं आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शहाजीबापू विरुद्ध शेकाप ही पारंपरिक लढत दिसणार असून शेकापचा हा तरुण शहाजीबापू याना भारी पडणार कि शहाजीबापू पुन्हा आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर बाजी मारणार हे या नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकात समोर येणार आहे.