CM Eknath Shinde:  महाराष्ट्रात सध्या बीआरएस (BRS) आपले हातपाय पसरत असल्याचं चित्र आहे. सोमवारी (26 जून) रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) त्यांच्या मंत्रिमंडळासहित आमदार आणि खासदारांना घेऊन सोलापुरात दाखल होणार आहेत. पण त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे पंढपुरात पोहचले आहेत. मुख्यमंत्री शिंदे रविवारी (25 जून) रोजी नांदेडमधून थेट विमानाने सोलापुरात पोहचले. तसेच त्यांनी पंढपुरात पाहणी करुन वारकऱ्यांशी देखील संवाद साधला. 


मुख्यमंत्री हे आषाढी एकादशीच्या दिवशी विशेष अतिथी असतात. त्यांच्याच हस्ते विठ्ठलाची पूजा देखील केली जाते. असे असूनही त्यांनी थेट आषाढी सोहळ्याच्या तयारीची पाहणी केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. रविवारी (25 जून) रोजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे पंढपुरात पोहचले. प्रथेप्रमाणे आषाढी सोहळ्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 28 जून रोजी मुख्यमंत्री पंढपुरात दाखल होणार होते. पण तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे 27 जून रोजी पंढपुरात दाखल होणार आहेत. पण त्याआधीच मुख्यमंत्री शिंदे पंढपुरात पोहचल्यामुळे राव यांचे गणित बिघडवल्याचं म्हटलं जात आहे. 


यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी वारकऱ्यांशी देखील संवाद साधला. दरम्यान आषाढीनिमित्त पाहणी करण्यासाठी आलेले ते पहिले मुख्यमंत्री आहेत. तसेच त्यांनी पंढपुरात आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचा देखील आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी दर्शन रांगेत जाऊन भक्तांशी देखील संवाद साधला. त्यानंतर मंदिर परिसर, भक्तांसाठी निवासासाठी योजना करण्यात आलेल्या 65 एकर तळाची पाहणी करुन ते परत गेले. 


दरम्यान वारकऱ्यांना दिलेल्या सुविधांसाठी ते खूष असून त्यामुळे आपण देखील समाधानी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पंढपूर देखील खड्डेमुक्त झालं असून आपण दिलेला निधी पूर्णत्वास गेल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे येत्या काळामध्ये बळीराजा, सामान्य नागरिक सुखी होऊ दे, पाऊस पडू दे इतकचं मागणं विठ्ठलाकडे मागितल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यांनी चंद्रभागा स्वच्छता व पंढरपुरातील इतर वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा देखील आढावा घेतला. तर चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्याविषयी बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'प्रत्येक विठ्ठल भक्ताला दर्शन घेण्याचा अधिकार आहे, विठुराया सर्वांचा आहे.'


महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्यासमोर एकाच वेळेस बीआरएस पक्षाचं प्रमोशन होईल या उद्देशानेच हे सर्व केलं जात आहे. मात्र त्याच वेळेस अनेक जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी करण्यातही पक्ष अग्रेसरच दिसतोय. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Latur Politics: भगव्या पताकात गुलाबी झेंडा ...BRS चा राजकीय अजेंडा