सोलापूर : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत असून, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'मला आणि प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात येत असल्याचा,' दावा शिंदे यांनी केला आहे. विशेष म्हणजे आज संध्याकाळी 5 वाजता भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेणार असून, त्यापूर्वी शिंदे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  


नेमकं काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे? 


अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे झालेल्या हूरडा पार्टी दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, 'माझा दोन वेळा पराभव झाला असला, तरीही प्रणिती ताईला किंवा मला भाजपकडून आमच्या पक्षात या असे सांगितले जात आहे. मात्र, काँग्रेस आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही असे स्पष्टीकरण देखील यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी दिले. तसेच, आता मी 83 वर्षाचा आहे. त्यामुळे आता मी दुसऱ्याचं बरोबर आहे असं कसं म्हणणार. तसेच प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही. राजकारणामध्ये असे (पराभव) होतं राहतात. पंडित जवाहरलाल नेहरू या माणसासोबत असं झालं. मात्र, परभवाबाबतीत पंडित नेहरू म्हणाले होते की, 'लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावे लागते. नंतर तो स्वतः चालतो. चालताना पडतो पुन्हा उठतो, पुन्हा पडतो पुन्हा उठतो. मग तो जेव्हा चालायला लागतो तेव्हा तो पुन्हा कधी पडत नाही'. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, आज वाईट दिवस आहेत, मात्र ते दिवस निघून जातील, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. 


सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये आल्यास स्वागत करू : गिरीश महाजन


दरम्यान यावर भाजपचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, "अनेक लोकांच्या मनात आहे की, भाजपशिवाय पर्याय नाही. सर्व देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. मुख्यमंत्री देखील राहिले आहेत. अनेक लोकांना वाटत आहे की, काँग्रेसमध्ये भवितव्य नाही. त्यामुळे आपला आणि आपल्या पुढच्या पिढीबद्दल असे वाटणे सहाजिक आहे. पण, त्यांना भाजपमध्ये या असे कोण म्हणाले याचा त्यांनी खुलासा केला नाही. पण अनेक लोकं आम्हाला म्हणत आहे की, आमचा विचार करा. त्यामुळे, आगामी काळात आणखी मोठे राजकीय भूकंप महाराष्ट्रातील राजकारणात होणार आहेत. सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्यास त्यांचे आम्ही स्वागत करण्यास सकारात्मक आहोत. त्यांना आमच्या पक्षात घेण्यात आम्ही नाही म्हणालो नाही आणि आम्हाला कोणतेही अडचण नसल्याचे देखील महाजन म्हणाले आहेत. 


भाजपमधील 60 ते 70 टक्के लोकं काँग्रेस पक्षातील: नाना पटोले 


यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून,"भाजप सत्तेसाठी किती हापापलेली आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्यांच्याकडे स्वतःची लोकं नाहीत. त्यांच्या पक्षातील 60 ते 70 टक्के लोकं काँग्रेस पक्षातून गेली आहे. मात्र, त्यांना सुशीलकुमार शिंदे यांनी योग्य उत्तर दिले असल्याचे," नाना पटोले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


सोलापुरातील राजकीय वातावरण तापणार; पुढील चार दिवस राष्ट्रीय नेत्यांसह स्थानिक नेत्यांचा सभांचा धडाका