कल्याण: सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अवघ्या आठ महिन्यांपूर्वी लोकार्पण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझचा पुतळा कोसळल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्टचरल इंजिनिअर चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांनाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. यापैकी शिल्पकार जयदीप आपटे हा कल्याणमध्ये वास्तव्याला आहे. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर जयदीप आपटे घराला टाळे लावून फरार झाला आहे. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी  जयदीप आपटेच्या घरी गेले तेव्हा त्याच्या घराला कुलूप होते. त्यामुळे आता जयदीप आपटे नेमका कुठे आहे आणि पोलीस त्याला कधी ताब्यात घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


जयदीप आपटे याला भारतीय नौदलाकडून फारसा अनुभव नसतानाही छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील 28 फुटांचा ब्राँझचा पुतळा उभारण्याचे काम देण्यात आले होते. जयदीप आपटेने अवघ्या सहा ते सात महिन्यांमध्ये शिवरायांचा हा पुतळा तयार केला होता. या कामापूर्वी जयदीप आपटेला इतके मोठे पुतळे उभारण्याचा कोणताही अनुभव नव्हता. त्यामुळे जयदीप आपटे याला नेमक्या कोणत्या निकषांच्याआधारे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच काम देण्यात आले, असा सवाल अनेकजण उपस्थित करत आहे. या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.


कोण आहे जयदीप आपटे?


जयदीप आपटे हा कल्याणमध्ये वास्तव्याला आहे. कल्याणमधील त्यांच्या शाळेच्या रस्त्यावरच शिल्पकार सदाशिव साठे यांचा स्टुडिओ आहे. त्यांच्या प्रभावामुळे आठवीत शिकत असतानाच जयदीपने कला क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे मूळ गाव कल्याण असून आई-वडील दोघेही नोकरी करायचे. जयदीप आपटेचे दहावीपर्यंतचे शिक्षण सुभेदार वाडा हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून कमर्शियल आर्टची पदविका व नंतर जे जे स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकलेचा डिप्लोमा त्यांनी केला होता.


भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून नाराजी


मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने अत्यंत संवेदनशील होते. राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने, जबाबदारीने आणि सावधपणे हाताळायला पाहिजे होते, अशी भावना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेनंतर महायुती सरकारमधील मंत्र्यांनी या पुतळ्याची जबाबदारी नौदलाची असल्याचे सांगत लगेचच हात झटकले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही, 'पुतळ्याचा आराखडा व उभारणी नौदलाने केली होती. ताशी 45 किलोमीटर वेगाने वार वाहत असल्याने पुतळ्याचे नुकसान झाले असावे', असे सांगत राज्य सरकारला या सगळ्या वादापासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. एकमेकांवर खापर फोडण्यापेक्षा राज्य सरकारने कोणतेही आढेवेढे न घेता याप्रकरणाची शांतपणे हाताळणी केली असती तर अधिक योग्य ठरले असते, अशी भावना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आली.


आणखी वाचा


सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणारा ठाण्यातील जयदीप आपटे नेमका कोण?