Sindhudurg News : कोकणचा राजा अर्थात हापूस आंबा (Alphonso) खाणाऱ्या खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील हापूस आंब्याची (Devgad Alphonso Mango) पहिली पेटी नवी मुंबईतील वाशी मार्केटला (Navi Mumbai APMC) रवाना झाली आहे. देवगड हापूसच्या यावर्षीची पहिली पेटी पाठवण्याचा कातवण गावातील दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे यांना मिळाला आहे.


देवडमधील कातवण गावातील दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आपल्या बागेतील हापूस आंबे मुंबईतील वाशी मार्केटला पाठवले आहेत. आज मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचा मुहूर्त साधून दोन डझन आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला पाठवली आहे. "या आंब्यांना किती दर मिळेल यावर सर्व शेतकऱ्यांचं पुढील आर्थिक गणित अवलंबून आहे," अशी प्रतिक्रिया या आंबा बागायतदारांनी दिली.


15 ऑगस्टच्या दरम्यान मोहोर 
कातवण इथले आंबा बागायतदार शिंदे यांच्या घरानजीकच्या आंबा बागेत हापूसच्या कलमांना 15 ऑगस्टच्या दरम्यान मोहोर आला होता. तो मोहोर तसाच टिकवून, मेहनत घेतली. कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांनी या मोहराची व्यवस्थित मशागत केल्यामुळे योग्य प्रमाणात फळधारणाही झाली. त्यामुळेच या चार कलमांवर मिळालेल्या आंब्याचे पहिले फळ काढत देवगड हापूसची पहिली पेटी आज मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या शुभ मुहूर्त रवाना केली.


विधीवत पूजा करुन आंब्याची पेटी रवाना
हंगामातील पहिला आंबा हा मुहूर्ताचा आंबा मानला जातो. त्यामुळे या आंब्याची विधिवत पूजा करुन संपूर्ण हंगाम चांगला जाऊ दे अशी प्रार्थनाही केली जाते. अगदी पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आजच्या बागायतदारांसह व्यापाऱ्यांनीही जपली आहे. त्यामुळे बाजारात जाण्यापूर्वी हापूस आंब्याच्या पेटीची पूजा करण्यात आली.


मुख्य हंगाम सुरु होण्यास अवधी
दरवर्षी वाशी एपीएमसीमध्ये फेब्रुवारी महिन्यात हापूस आंब्याच्या आवक होण्यास सुरुवात होते. त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आवक वाढून मुख्य हंगाम जोर पकडतो. यंदा आंब्याचं उत्पादन कमीच राहणार असल्याचं तज्ज्ञ सांगतात. परतीच्या पावसामुळे झालेलं मोठं नुकसान यामुळे आंब्याचा मोहोर गळून पडत आहे. त्यामुळे आंब्याची पहिली पेटी जरी रवाना झाली असली तरी हापूसचा मुख्य हंगाम सुरु होण्यात अजून अवधी आहे. दोन वर्षांपूर्वी कोविड-19 महामारी आणि त्यामुळे लागलेला लॉकडाऊन यामुळे हापूसचा हंगाम वाया जाऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं