- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.
- स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.
- शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा.
- शेतकर्यांना पेन्शन योजना लागू करावी.
शेतकऱ्यांचा संप हे राज्यकर्त्यांचं अपयश, उद्धव ठाकरेंची सरकारवर तोफ
एबीपी माझा वेब टीम | 02 Jun 2017 09:29 PM (IST)
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांचा संप हे राज्यकर्त्यांचं अपयश आहे. शेतकऱ्यांच्या या जीवन-मरणाच्या लढ्यात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, असं म्हणत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी संपाला पाठिंबा दिला आहे. कर्जमाफी, हमीभाव यांसारख्या विविध मागण्यांसाठी राज्यातील बळीराजा 1 जूनपासून संपावर गेला आहे. शेतकऱ्यांकडून राज्यभरात, दूध, भाजीपाला, फळं यांची विक्री बंद करण्यात आली आहे. तर शहरामध्ये पाठवलं जाणारं दूध आणि भाजीपालाही बंद करण्यात आला आहे. राज्यभरातील शेतकरी संपावर राज्यभरात 1 जूनपासून शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. या काळात गावातून शहरात फळं, भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूही पाठवणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला होता. हा संप मागे घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव दिला. त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता एक जूनपासून शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे. संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?