मुंबई : “शेतकरी संपाआड आमच्यावर हिंसा भडकवण्याचे आरोप करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. शिवाय, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. ठोस पुरावा असेल तर सिद्ध करा.” असं जाहीर आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.


शेतकऱ्यांनी जर काँग्रेस-राष्ट्रवादीचं ऐकून आंदोलन केलं असतं, तर झेडपी आणि विधानसभेचा निकाल वेगळा लागला असता, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना एक न्याय आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेगळा न्याय का?, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

“दूध संघात गैरप्रकार झाले आहेत, तर सिद्ध करा. फक्त आरोप आणि चौकशा करायच्या आणि चारित्र्यहणन करणं सुरू आहे. ‘महानंद’च्या चेअरमनपदी तुमचीच माणसं आहेत. दोषी असेल त्यांना शिक्षा द्या, जनतेची दिशाभूल करू नका.”, असंही पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांना आव्हानं दिलं.

पृथ्वीराज चव्हाणांचं अण्णा हजारेंना आवाहन!

“अण्णांची तब्येत बरी नाही. अण्णांच्या तोंडाला लोकपालच्या बाबतीत या सरकारने पानं पुसली. शेतकऱ्यांसाठी पुढे आल्याबद्दल अण्णांचं अभिनंदन. पण अण्णांना नम्र विनंती आहे की चर्चेच्या गुराळात फसू नका, तर शेतकऱ्यांच्या मुख्य आश्वासन पूर्ण करण्यास मुख्यमंत्र्यांना भाग पाडा.”, असं आवाहन पृथ्वीराज चव्हाणांनी अण्णा हजारेंना केलं.

“कर्जमाफीला विरोध करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका बदलली ही चांगली गोष्ट आहे. आधी म्हणाले देणार नाही. मग म्हणाले, केंद्रातून देऊ. आता म्हणत आहेत, छोट्या-मोठयांना देऊ. नेमकं मुख्यमंत्र्यांना काय करायचं आहे, याचा प्रस्ताव एकदाच समोर येऊ द्या.”, असे पृथ्वीराज चव्हाण अल्पकर्जधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भातील वृत्तावर बोलताना म्हणाले.