सातारा : पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्यांसह धरणांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. सातारा जिल्ह्यात (Satara Rain Update) गेल्या गेल्या तीन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे कोयना (Koyna Dam Water Level) धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मात्र, अजूनही कोयना धरण भरण्यासाठी 12 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, आता परतीचा पाऊस असल्याने परतीचा पाऊस कितपत साथ देतो यावर कोयना धरण चालू मोसमात शंभर टक्के पूर्ण भरणार की नाही? याबाबत साशंकता आहे.


पाणीसाठा अत्यल्प असल्याने परिस्थिती चिंताजनक


कोयना धरणात आजच्या घडीला 93 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी आहे. दुसरीकडे सातारा जिल्ह्यामध्ये पूर्व तसेच पश्‍चिम भागामध्ये पाऊस होत आहे. कोयना धरण्याची प्रतीक्षा असतानाच सातारा जिल्ह्यातील अन्य धरणांमध्येही पाणीसाठा अत्यल्प असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. मोसमात सातारा जिल्ह्यामध्ये सुरुवातीलाच अपेक्षित पाऊस झाला नसल्याने एकंदरीत धरणे भरलेली नाहीत. सातारा जिल्ह्यात धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी तारळी अशी मोठी धरणे आहेत. त्यामुळे अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे. बहुतांश धरणात अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. 


यंदा पाणीटंचाई भासण्याची चिन्हे


सातारा जिल्ह्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोर पकडला होता. त्यानंतर जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने पूर्ण दडी मारली. सप्टेंबर महिन्यामध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नाही. त्यामुळे यंदा पाणीटंचाई भासण्याची चिन्हे आहेत. सातारा जिल्ह्यात तुलनेत पाऊस झालेला नाही. त्यामुळे परतीचा पाऊसही कोरडा गेल्यास परिस्थिती नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच आव्हानात्मक असणार आहे. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात आतापासून टँकर्सने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. 


दुसरीकडे, 'एल निनो'मुळे (El Nino weather pattern) ऑगस्ट महिना शतकातील अधिक काळ सर्वात कोरडा ठरला. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरातील पाऊस सरासरीच्या 94 टक्के होता. जो 2018 नंतरचा सर्वात कमी आहे, असे भारतीय हवामान विभाग (IMD) ने एका निवेदनात म्हटले आहे. आयएमडीने एल निनोचा मर्यादित प्रभाव गृहीत धरून हंगामात 4 टक्के पावसाची तूट अपेक्षित धरली होती. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत देशात सामान्य पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या