मुंबई: प्रतापगड पायथ्याजवळील (Satara Pratapgad) अफजलखान कबर  (Afzal Khan) जवळील अतिक्रमण हटवल्यानंतर राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी आता अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा देखावा असणारा छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या संबंधिती घोषणा केली आहे. 


राज्य सरकारने शिवप्रतापदिनाचे औचित्य साधत प्रतापगडावरील अफजलखानच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास पाडलं. 10 नोव्हेंबर रोजी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचा वध करण्यात आला होता आणि याच दिवशी अनाधिकृत बांधकाम पाडण्यात आली. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर सर्व स्तरातून आनंद व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आता राज्य सरकारने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार असल्याची घोषणा केली.


 






अफझलखानाच्या वधाला यंदा 350 वर्षे पूर्ण झाली आहेत. अफजलखानाच्या कबरीजवळ ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे त्या ठिकाणी आता अफजलखानाचा कोथळा बाहेर काढत असणारा देखावा असलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. याचसोबत या ठिकाणी लाईट आणि साऊंड शो सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे. 


कबरीवर झालेले खालील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं,



  • कबरीच्या बाजूला  सात खोल्या

  • कबरीसमोर हॉल

  • मुजावरांना राहण्यासाठी खोल्यांची व्यवस्था

  • आठ  गुंठ्यात अनधिकृत बांधकाम


अफजलखानच्या कबरीजवळ इतर दोन कबरी आढळल्या 


दोन दिवसांपूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्यात आलं. मात्र, तिथे आणखी दोन कबरी आढळून आल्या आहेत. यातील एक कबर ही अफजलखानाचा वकील असलेल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याची आहे, असा दावा संभाजी ब्रिगेडने केला आहे. तर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचा दहन विधी झाल्याचा उल्लेख असल्याचा दावा हिंदू महासंघाने केला आहे. या कबरी नेमक्या कोणाच्या याबाबत सध्या माहिती घेण्याचे काम महसूल विभागाकडून केले जात आहे.