सांगली : राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर आता काँग्रेसमध्ये (Congress) सुद्धा राजीनामास्त्र सुरु झालं आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आदर्श घोटाळ्यात ज्यांची सर्वाधिक चर्चा रंगली त्या अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज (12 फेब्रुवारी) काँग्रेसमधील पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या वाटेवर असलेली चर्चा रंगली होती. मात्र, त्यांनी आजपर्यंत या चर्चेला कुठलाच दुजोरा दिला नव्हता. या सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या. मात्र, अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत एक प्रकारे भाजपमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये सुद्धा फुटीची चर्चा रंगली आहे. 


राजीनामा दिला अशोक चव्हाणांनी अन् विश्वजित कदमांची!


अशोक चव्हाण यांनी भाजपचा मार्ग पकडल्याने त्यांचे समर्थक आमदार काय भूमिका घेणार? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे पलूस कडेगावचे आमदार आणि स्वर्गीय काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजीत कदम (Vishwajeet Patangrao Kadam) यांचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्रातून अशोक चव्हाण यांच्या सोबत विश्वजीत कदम सुद्धा जाणार अशी चर्चा राजकीय चर्चा रंगली आहे. मात्र, या सर्व चर्चा विश्वजित कदम यांनी फेटाळून लावल्या आहेत. विश्वजित कदम यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.  


विश्वजित कदम म्हणाले, मी अजूनही काँग्रेसमध्येच 


विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. ज्या पलूस-कडेगावनं स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांना प्रेम, साथ दिली त्याच कडेगावच्या आमच्या माता-भगिनी, ज्येष्ठांनी, तरुण कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांनी मलाही विधानसभेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याची, महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली आणि म्हणून माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामध्ये माझ्या पलूस-कडेगावच्या बंधू-भगिनींना विश्वासात न घेता मी पाऊल टाकणार नाही. कुणीही कुठलाही गैरसमज या ठिकाणी करू नये. 


विश्वजित कदमही काठावर?


अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील एक नेता फुटणार, अशी चर्चा रंगली आहे. यामध्ये विश्वजित कदम यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सांगलीमध्ये विद्यमान भाजप खासदार संजय पाटील यांच्याविरोधातील नाराजी लक्षात घेता भाजपकडून पडद्यामागून सक्षम उमेदवाराचा शोध सुरु आहे. त्यामुळे विश्वजित कदम यांना गळ टाकून त्यांनाच लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यासाठी हालचाली सुरु नाहीत ना? अशीही चर्चा रंगली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या