सांगली : संजय राऊतांनी कोंबड्यासारखं रोज बांग देणं बंद करावं आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी त्यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे असं पत्र द्यावं असा टोला आमदार सदाभाऊ खोत यांनी लगावला. शरद पवार-रोहित पवारांनी महाराष्ट्रात आग लावण्याचं काम बंद करावं असंही सदाभाऊ खोत म्हणाले. तसेच आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वळू-रेड्यांना चाबकाने फोडून काढणार असंही ते म्हणाले. गलीच्या शिराळा येथील रयत क्रांती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी खोत बोलत होते.


रोज एक घर कोंबडा आरोळी देतो  संजय राऊत नावाचा. त्या कोंबड्याला मी  सांगतो, रोज भांग देऊ नकोस खुरुड्यातनं. तू एक पत्र लिहून दे जरांगे पाटलांना की माझी उबाठा सेना मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करायला पाठिंबा देत आहे. अरे बघूया कोंबड्या तुझ्यात जोर आहे का? असं आमदार सदाभाऊ खोत म्हणाले. 


शरद पवार हे आग लावण्याचं काम करतात


सदाभाऊ खोत म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात आग लावण्याचे काम शरद पवार करत आहेत हे वेळीच मराठा समाजाने ओळखलं पाहिजे. सगळं दिल्यानंतरही ते या राज्यांमध्ये मराठा समाजामध्ये दुही माजवण्याचे काम करत आहेत. मी अनेक वेळा वक्तव्य केलं आहे, जी माणसं महाविकास आघाडीमधून निवडून आले आहेत त्यांनी सरकारला एक पत्र लिहावं. जरांगे पाटलांना मी खासदार अमुक अमुक लिहून देतो की मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करायला माझा पाठिंबा आहे. रोहित पवार विद्वान माणूस आहे, महाराष्ट्रात आग लावत सुटलाय. भाडोत्री सोशल मीडिया महाराष्ट्रात तुम्ही ठेवलीय. रोहित पवार तुम्ही लिहून द्या की मराठा समाज ओबीसीमध्ये समावेश करायला या रोहित पवाराचा पाठिंबा आहे. हे आग लावायचे धंदे या महाराष्ट्रातून बंद करा. लोकसभेला जमलं म्हणून आता जमेल ही भावना काढून टाका.


महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर अनेक चांगले निर्णय घेतले, अनेक योजना आणल्या. पण महाविकास आघाडीचे नेते टीका करतात. येणाऱ्या निवडणुकीत या महाविकास आघाडीतील वळू रेड्यांना चाबकाने फोडून काढू अशी टीका ही खोत यांनी केली.