सांगली : सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्याने नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे पावसाने अंत्यंसंस्कार सुद्धा रोखल्याचे चित्र आहे. कृष्णा नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीमध्ये पाणी शिरले असून नदीकाठच्या या स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार आता बंद केले जाणार आहेत. पर्यायी मार्ग म्हणून कुपवाड भागातील स्मशानभूमीमध्ये आता अंत्यसंस्कार प्रक्रिया केले जाणार असल्याचे सांगली महापालिका प्रशासनाने माहिती दिली.



मिरजमधील वॉर्ड क्र 20 कृष्णा घाट स्मशानभूमीत देखील पुराचे पाणी आले असल्याने स्मशानभूमी बंद करण्यात आली आहे. पर्यायी स्मशानभूमी पंढरपूर रोडला सुरू करण्यात आली आहे.  दरम्यान, आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी 30 फुटांवर गेल्यानंतर सांगलीच्या सूर्यवंशी प्लाॅटमध्ये पुराचे पाणी दाखल झाले. याठिकाणच्या 10 कुटुंबांचे बुधवारी स्थलांतर करण्यात आले. पाणीपातळीत वाढ झाली तर परिसरातील आणखी काही कुटुंबांचे स्थलांतर करावे लागणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. सांगलीच्या सूर्यवंशी प्लॉटमध्ये मध्यरात्री पाणी दाखल झालं आहे.


महापालिकेच्या सुचनेनुसार काही कुटुंबांनी नातेवाईकांकडे तर काहींनी महापालिकेच्या पुनर्वसन केंद्रात स्थलांतर केले. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने सूर्यवंशी प्लॉटमधील सर्व नागरिकांसह इनामदार प्लॉट, कर्नाळ रोड, शिवमंदिर परिसर, मगरमच्छ कॉलनीतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. घरातील साहित्य सूरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या