Jayant Patil on ED Notice: लग्नाच्या वाढदिवशी हवालदार माझ्या घरी आला आणि मला ईडीची नोटीस देऊन गेला, अशा मिश्किल शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडीकडून देण्यात आलेल्या नोटिसीला उत्तर दिलं. तसेच त्या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही, अशा कोणत्याही कंपनीच्या दारात सुद्धा आपण गेलो नाही असे स्पष्ट करत आता ईडीने बोलावलं, तर चौकशीला सामोरे जाणार असं देखील जयंत पाटलांनी स्पष्ट केले. 


आयएल आणि एफएलएसच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या नोटीसीनंतर सांगलीमध्ये जयंत पाटलांनी आपलं स्पष्टीकरण दिलं. काही दिवसांपूर्वी निपाणीमध्ये कर्नाटकच्या निवडणूक प्रचारसभेत जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना भाजपने त्यांना फौजदाराचे हवालदार केलं, अशी मार्मिक टीका केली होती. 


यानंतर आलेल्या नोटीसीवरून बोलताना माझ्या घरी एक हवालदार आला आणि त्याने मला नोटीस दिली, अशा मिश्किल शब्दात ईडी नोटीसीवर प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर ज्या संस्थेचा आर्थिक घोटाळा झाला आहे त्याचा आणि आपला कसलाही संबंध नाही, आपण त्या संस्थेच्या दारात देखील कधी गेलेलो नाही किंवा कर्जही काढलेलं नाही. पण आता ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे त्याच्या चौकशीला आपण सामोरे जाणार असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.


ईडीची नोटीस कशासाठी हे येते हे भारतात सगळ्यांनाच माहीत 


जयंत पाटील म्हणाले की, दोन-तीन दिवस लग्नसराई आहे, जवळच्यांची लग्न आहेत. त्यामुळे वेळ मागणारे पत्र मी आज पाठवून देणार आहे. ईडीची नोटीस कशासाठी हे येते? हे भारतात सगळ्यांनाच माहीत झाले आहे. त्यामुळे त्यांना जी सोयीची तारीख वेळ वाटते तशी ती नोटीस पाठवतात. माझं राजकीय आयुष्य म्हणजे उघडी किताब आहे. घोटाळे करण्याचे कार्यक्रम मी कधी केले नाही. तुम्हाला कारण माहिती आहेत, यावर सविस्तर नंतर सविस्तर बोलू असेही ते म्हणाले. 


अध्यक्षपदावर शरद पवार यांच्यासाठी आग्रही होता त्यामुळे ही नोटीस आली का? असे विचारले असता ते म्हणाले की, या प्रश्नावर जयंत पाटील यांचा असू शकेल असं उत्तर असेल. आपण राजकारणात आहोत समोरच्याने काहीच करू नये असं गृहीत धरणं चुकीचं आहे. कर्ज काढायचं नाही हे माझं लहानपणापासून धोरण आहे. कर्ज काढलं की माणूस घोटाळ्यात येतो त्यामुळे माझा आयएलएफसी काही संबंध नाही. नोटीसीला सहकार्य करणार, योग्य उत्तर देऊ. उद्या हजर राहायला सांगितलं होतं मात्र  वेळ मागणारे पत्र आज देणार आहे. आमच्या पक्षात कोणतेही अंतर्गत मतभेद नाही. राजीनामा नाट्यानंतर अजित पवार आणि माझी फारशी चर्चाही झालेली नाही. या आधी ज्यांना नोटीसी आल्या त्यांच्याशी बोललो आहे. राष्ट्रवादी सोडून महाराष्ट्रात दुसरा पक्ष नाही असं ईडीला वाटत असेल, असा टोलाही त्यांनी लगावला. 


इतर महत्वाच्या बातम्या