Sangli Loksabha : सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वाद चांगलाच पेटला आहे. या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आल्यानंतर काँग्रेसमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. या जागेसाठी आमदार विश्वजित कदम यांनी प्रतिष्ठा पणाला लावत पार गल्ली ते दिल्ली भेटींचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. आता त्या जागेवरून अन्य ठिकाणी मिठाचा खडा पडणार का? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगलीच्या जागेवरून वाद-विवाद सुरू असताना जाता या वादामध्ये अजित पवार गटाने सुद्धा उडी मारली आहे. त्यामुळे अजित पवार गटाचा रोख नेमका कोणावर? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. 


उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन चंद्रहार पाटील यांच्या हाताने.... 


अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी सांगलीच्या जागेवरून सुरु असलेल्या वादावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष तोफ डागताना खोचक शब्दांमध्ये ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन चंद्रहार पाटील यांच्या हाताने विशाल पाटील यांना गोळी मारायला लावणाऱ्याला मानलं पाहिजे.खांदा उद्धव ठाकरेचा,गोळी मारणारा चंद्रहार पाटील,बळी विशाल पाटलांचा ... 






सांगलीच्या जागेवरून दावे प्रतिदावे सुरु असतानाच आता अप्रत्यक्ष आरोप सुद्धा केले जात आहेत. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून एक प्रकारे ठिणगी पडली आहे का? अशी सुद्धा चर्चा आहे. आज (6  एप्रिल) विशाल पाटील यांचे पायलट कोणीतरी असून ते पायलट फक्त गुजरातच्या दिशेने फक्त जाऊ नयेत अशा खोचक शब्दात विश्वजित कदम यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केली. यानंतर नागपूर दौऱ्यावर असलेल्या कदम यांनी सुद्धा या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना जनावरला सुद्धा विचारल्यास तो सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सांगेल अशा शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले.


दुसरीकडे, तासगावमध्ये मेळाव्यात बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला लगावला. ते म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आव्हान केले आहे. तुमची नौटंकी बंद करा आणि सामील व्हा. नाहीतर लोक तुम्हाला माफ करणार नाहीत. चंद्रहार पाटील यांना या मतदारसंघात प्रामाणिकपणाने मदत करा आणि मोठ्या संख्येने मेहनत करून त्यांना निवडून द्यावे, असे आवाहन संजय राऊत यांनी तासगावमधील मेळाव्यात बोलताना केले. 


इतर महत्वाच्या बातम्या