Nilesh Rane Banner : भाजपचे (BJP) माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांची शनिवारी, 16 फेब्रुवारीला सभा होणार आहे. नितेश राणे यांची भास्कर जाधवांच्या (Bhaskar Jadhav) गुहागर (Guhagar) मतदारसंघात तळी (Tali) येथे सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या निमित्ताने निलेश राणे यांची जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. निलेश राणे याचे बॅनर मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथे लावण्यात आले आहेत. विषेश म्हणजे या बॅनरवर 'टायगर कमिंग बॅक' असंही लिहिण्यात आलं आहे. निलेश राणेंचे हे बॅनर भास्कर जाधवांच्या कार्यालयाजवळ लावण्यात आले आहेत. 


निलेश राणे यांची जोरदार बॅनरबाजी


निलेश राणे यांच्या जाहीर सभेसाठी तळकोकणासह कोकणातून जवळपास साडेतीनशे कार्यकर्त्यांच्या गाड्या येणार आहेत. भास्कर जाधव आणि राणे यांच्यातील 11 वर्षापासूनचा राजकीय संघर्ष पाहायला मिळत असून हा अद्यापही कायम आहे. निलेश राणे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर उबाठाचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर पोलिस संरक्षण वाढवण्यात आलं आहे. भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात निलेश राणेंची जाहिर सभा असल्याने पोलीस प्रशासन कामाला लागलं आहे. भास्कर जाधवांनी राणे पिता-पुत्रांवर  टीकेला प्रतिउत्तर देण्यासाठी निलेश राणेंनी जाहिर सभा आयोजित केली आहे.


निलेश राणे विरुद्ध भास्कर जाधव


कोकणकरांना भास्कर जाधव आणि निलेश राणे हा संघर्ष काही वेगळा नाही. कोकणातील दोन दिग्गज नेते कोकणावरती आपापलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपापसात लागलेली चढाओढ आणि त्यातून संघर्ष वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. राणे आणि जाधव हे दोन्ही मराठा समाजाचे नेते असून राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या राणे आणि त्यांच्या पुत्रांना आता सिंधुदूर्गसह रत्नागिरी जिल्ह्यावरही पूर्ण वर्चस्व स्थापन करायचं असल्यानेच हा संघर्ष सुरू झाल्याचे राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे.


या संघर्षाचा इतिहास काय?


राणे यांच्या आधीच भास्कर जाधव यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. ‘मातोश्री’वर तिकीट मागायला गेलो असताना पैसे मागितल्याचा घणाघाती आरोप करून जाधव यांनी शिवसेनेला रामराम ठोकून अपक्ष निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचा केवळ काहीशे मतांनीच पराभव झाला होता. मात्र, मतदारसंघातील त्यांचे वर्चस्व हेरून शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेवर नेले. त्यानंतर निवडणुकीत ते निवडून आल्यानंतर त्यांना तात्काळ राज्यमंत्रीपदही दिले.जाधव यांना राज्यमंत्री केल्यानंतर त्यांनीही राणे यांच्याच स्टाईलमध्ये चिपळूण आणि आजूबाजूच्या परिसरावर आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी चंग बांधला. या पार्श्वभूमीवर येत्या निवडणुकांच्या निमित्ताने हा वाद अधिक चिघळला.