मुंबई :  कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला वेग आला असून त्याचा प्राथमिक अहवालही रेल्वे बोर्डाला दिलाय. तो मंजूर झाला की या कामाला वेग येणार असून त्यामुळं जादा गाड्या सोडता येतील, गाड्यांचा वेग वाढेल.  कोकण रेल्वे सुरु होऊन 31 वर्षे झाली. 1998  पासून तर ती पूर्णपणे सुरु आहे. कोकण,गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीच्या बाजूनं धावणाऱ्या रेल्वेगाड्या तिथलं निसर्गसौंदर्य तुमच्या जवळ आणून ठेवतात. गेल्या दोन दशकात कोकण रेल्वेवरचे प्रवासी वाढले. रेल्वे स्टेशन्स आणि गाड्याही वाढल्या. पण हे सारं एकाच रेल्वे रुळावर सुरु आहे. गाड्यांच्या पासिंगसाठी ठराविक ठिकाणी असलेला ट्रॅक सोडला तर 740 किलोमीटरचं अंतर फक्त एका ट्रॅकवर सुरु आहे. रोज 75 हून अधिक प्रवासी व मालगाड्यांची ये जा या एकाच ट्रॅकवर सुरु असते. परिणामी प्रवासात निष्कारण जादा वेळ जातो. पण आता ही गैरसोय दूर होणार आहे. कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचा प्राथमिक अहवाल रेल्वे मंडळाकडं सुपूर्द केला आहे.


कोकण रेल्वेचा पसारा हा रोहा ते ठोकुर अशा 740 किमी अंतरापर्यंत पसरलेला आहे.मात्र कोकण रेल्वेवर रोहा ते वीर 46.8  किमीचा रेल्वे मार्गाचे ऑगस्ट 2021  रोजी दुहेरीकरण पूर्ण झाले. मात्र त्यानंतर दुहेरीकरणाबाबत जलदगतीनं पावलं उचलली गेली नाहीत.त्यामुळे प्रवाशांचा प्रवास रखडत होतो.उत्तर आणि दक्षिण भारताला कमी प्रवास खर्चात आणि जलदगतीने जोडण्याचे काम कोकण रेल्वेकडून करण्यात येते.पण वाढत्या गर्दीला सामावून घेण्याची क्षमता कोकण रेल्वेमध्ये नसल्याने,अनेक वर्षांपासून कोकण रेल्वेचे दुहेरीकरण करण्याची मागणी 


कोकण रेल्वेचे संपूर्ण दुहेरीकरण करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आता टप्पा दुहेरीकरण करण्याकडे कोकण रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे.


कसे असेल दुहेरीकरण ?


सपाट जमिनीवर रेल्वेच्या प्रतिकिमी दुहेरीकरणासाठी साधारणपणे 15 ते 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर,घाट,बोगद्याच्या ठिकाणी प्रति किमी खर्च 80 ते 100 कोटी रुपये अपेक्षित आहे. रोहा ते वीर दरम्यानचं दुहेरीकरण पूर्ण झालं असून त्यासाठी 530  कोटी रुपये खर्च आला. आता मडगाव ते ठोकुर आणि कणकवली ते सावंतवाडी दरम्यान टप्पा दुहेरीकरण केले जाईल.सध्या कोकण रेल्वेवरून दरदिवशी 55  रेल्वेगाड्या आणि 18 मालगाड्या धावतात. टप्प्या दुहेरीकरण झाल्यास, रेल्वेगाड्या धावण्याची क्षमता दुप्पट होईल. 


उन्हाळी सुट्टीच्या काळात कोकणात जाणार्‍या प्रवाशांचे प्रचंड हाल


कोकण रेल्वेनं जायचं म्हंटलं की प्रवाशांचे मोठेच हाल होतात. रेल्वेगाड्या उशिरानं धावणं, जादा रेल्वेगाड्या नसणं, मर्यादित स्थानकांनाच थांबा असणं, अवेळी विशेष रेल्वेगाड्या चालवणं अशा समस्या प्रवाशांना भेडसावतात. कोकण रेल्वेसमोर वक्तशीरपणा वाढवण्याचं मोठं आव्हान आहे. कोकण रेल्वेवरच्या प्रवाशांचा प्रवास कायम उशिरानंच होतो. उन्हाळी सुट्टीच्या काळात कोकणात जाणार्‍या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. 


कोकण रेल्वेवरील ब्लॉक काळात काही रेल्वेगाड्यांना 10 तासांपेक्षा जास्त कालावधी


मुंबईहून सुटलेल्या नियमित आणि विशेष रेल्वेगाड्यांना 1 ते 2 तास उशिरा झाला. काही रेल्वेगाड्या यापेक्षाही अधिक विलंबानं धावल्या. कोकण रेल्वेवरील ब्लॉक काळात काही रेल्वेगाड्यांना 10 तासांपेक्षा जास्त कालावधी लागला. या काळात कोकण रेल्वेचा वक्तशीरपणा 59 टक्क्यांपर्यंत खाली घरसला होता. तर सध्याच्या घडीला 80 ते 85 टक्क्यांच्या दरम्यान आहे. दरम्यान, कोकण रेल्वेचा वक्तशीरपणा वाढवण्यावर भर दिला जात आहे. येत्या काळात कोकण रेल्वेचा वक्तशीरपणा 95  टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कोकण रेल्वेवर 2 हजार 116 पूल आणि 92 बोगदे आहेत. यावरुन हा मार्ग उभारणं किती आव्हानात्मक होतं याची कल्पना येते. आता दुहेरीकरणातसुद्धा ही आव्हानं कायम असतील.