मुंबई : सप्टेंबर महिना संपला आहे. म्हणजे पावसाळ्याचे चार महिने संपले. किंबहुना परतीच्या पावसाचा कालावधीही संपला आहे. मात्र परतीचा पाऊस लांबला आहे.


जून ते सप्टेंबर या चार महिन्यात महाराष्ट्रात सरासरी 1002.7 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा प्रत्यक्षात 1002.6 मिमी म्हणजे सरासरी इतका पाऊस पडला आहे.

विदर्भाची भिस्त परतीच्या पावसावर

त्याचवेळी, राज्यात पावसाने कागदावर सरासरी गाठली असली तरी विदर्भासारखा मोठा विभाग सरासरीपासून बराच दूर राहिला आहे. दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या विदर्भाची परतीच्या पावसावर भिस्त आहे.

विभागनिहाय पडलेला पाऊस

कोकण आणि गोवा : कोकण आणि गोव्यात सरासरी 2905.2 मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात आतापर्यंत 3188.7 मिमी म्हणजेच सरासरीच्या 10 टक्के जास्त पाऊस पडला.

मध्य महाराष्ट्र : मध्य महाराष्ट्रात या चार महिन्यात सरासरी 723.9 मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात 847.7 मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा 17 टक्के जास्त पाऊस पडला.

मराठवाडा : मराठवाड्यात सरासरी 678.9 मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात 642.2 मिमी म्हणजे सरासरीच्या 5 टक्के कमी पाऊस पडला.

विदर्भ : विदर्भात सरासरी 952 मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात 730.9 मिमी म्हणजेच सरासरीच्या 23 टक्के कमी पाऊस पडला.

राज्यातील पावसाच्या काही ठळक गोष्टी :

  • राज्यात सरासरीच्या 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला,असा एकही तालुका नाही.

  • 25 तालुक्यात सरासरीच्या 25 ते 50 टक्के पाऊस झाला आहे.

  • 112 तालुक्यात सरासरीच्या 50 ते 75 टक्के पाऊस झाला आहे.

  • 115 तालुक्यात सरासरीच्या 75 ते 100 टक्के पाऊस झाला आहे.

  • 101 तालुक्यात सरासरीच्या 100 टक्के किंवा त्याहून अधिक पाऊस झाला आहे.