Raigad Bulk Drug Park Project : राज्यातील प्रकल्प बाहेर गेल्यामुळे मागील काही दिवसांत राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पण रायगडमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळल आहे. रायगड जिल्ह्यातील बल्‍क ड्रग प्रकल्‍पाविरोधात अलिबाग येथे शेतकऱ्यांनी आज मोर्चा काढला होता. यावेळी प्रकल्‍पाला जमिनी न देण्‍याचा शेतकरयांनी निर्धार केल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी शेतकऱ्यांनी 
रोहा - मुरूड तालुक्‍यातील प्रस्‍तावीत प्रकल्‍पाबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रकल्पग्रस्तांच्या मुददयावर सरकारशी चर्चा करण्‍यास तयार, असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. 


रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित बल्क ड्रग्ज प्रकल्पाच्या माध्यमातून मूठभर लोकांच्या फायद्यासाठी जमिनी न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. यासाठी, रोहा आणि मुरूड परिसरातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विरोध दर्शविला आहे. राज्यातील फॉस्कॉन प्रकल्प गुजरातला गेल्याचे समोर आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील बल्क ड्रग्ज प्रकल्प देखील रद्द झाल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला. यामुळे, रायगड जिल्‍हयातील रोहा - मुरूड तालुक्‍यातील प्रस्‍तावीत बल्‍क - ड्रग प्रकल्‍पाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये, रोहा आणि मुरूड तालुक्यातील सुमारे १४ गावातील जमिन  ही एमआयडीसीसाठी संपादीत करण्यात आली आहे. 


रोहा तालुक्यातील न्हावा, सोनखार, नवखार , दिव, खारकर्डी, बेलखार, खुटल  या गावांचा समावेश असून मुरूड तालुक्यातील तळेकर , सावरोली, चोरडे, ताडवाडी, सातिर्डे, वलके, शिरगाव या गावांतील जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यातच, रायगड जिल्ह्यातील रोहा आणि मुरूड परिसरातील  गावकऱ्यांचे उत्पन्न हे शेती आणि मासेमारीवर अवलंबून आहे. यामुळे, काही गावकऱ्यांना प्रकल्प येणे गरजेचे असल्याचे म्हणणे असून काही ग्रामस्थ हे प्रकल्पांना विरोध करीत आहेत. त्यातच, रोहा तालुक्यातील न्हावे गावाची सुमारे १४०० एकर जमीन यासाठी घेण्यात आली आहे.  दरम्यान, या परिसरात येणाऱ्या प्रकल्पात गावकऱ्यांना योग्य मोबदला, भूखंड, नोकरी याची हमी शासनाने देण्याची मागणी करण्यात येत आहे. 


दरम्यान, रोहा आणि मुरूड तालुक्यातील संभाव्‍य प्रकल्‍पग्रस्‍त शेतकऱ्यांनी आज अलिबाग येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी, शेतकरयांचा विरोध असताना मुठभर लोकांच्‍या फायद्यासाठी जर कुणी प्रकल्‍प आणू पहात असेल तर त्‍याला शेतकऱ्यांचा विरोध कायम राहील असा निश्चय करण्यात आला आहे.  तर, या प्रकल्‍पाला जमिनी देणार नाही, असा निर्धार यावेळी व्‍यक्‍त करण्‍यात आला असून विरोध प्रकट करण्‍यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. तर, प्रकल्पग्रस्तांच्या मुददयावर सरकारशी चर्चा करण्‍यास तयार असल्याचे आंदोलनाचे प्रमुख ऍड. महेश मोहिते यांनी म्हटले आहे.