Maharashtra Politics : राज्यातला सुप्रीम कोर्टातला सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) दीर्घकाळ चालेल असे संकेत शिंदे गटाकडून देण्यात येत आहे. या सत्तासंघर्षाचा निकाल किमान 5 वर्षे लागण्याची शक्यता नाही असं खळबळजनक विधान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogawale) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण आहे. कर्जत येथे रविवारी शिंदे गटाने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. 


राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर शिंदे गटाकडून आता कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले जात आहेत. भरत गोगावले हे रायगडमधील महाड येथील आमदार आहेत. शिंदे गटाने  कर्जत येथे रविवारी आपला पहिला मेळावा घेतला. या मेळाव्यात भरत गोगावले यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आता घटनापीठाकडे गेला आहे. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण पाच वर्ष चालणार आहे. येत्या निवडणुकीत आम्हीच निवडून येणार असल्याचे गोगावले यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे मिशन आम्ही रोखले आहे. भाजप आणि शिवसेनेचे मिशन 200 पूर्ण करायचे आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांचे समर्थक असून चमत्कार घडवणार असल्याचे गोगावले यांनी म्हटले. 


आम्ही गद्दार नाही, धनुष्यबाण आमचाच!


आम्ही गद्दार होऊ शकत नाही असेही भरत गोगावले यांनी म्हटले. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचे काम करत आहोत, असेही त्यांनी म्हटले. शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण आमच्याकडे राहणार असून आम्हीच पुन्हा आमदार होणार असल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे. आमचा नाद करायचा नाही असं म्हणत गोगावले यांनी विरोधकांना इशारा दिला. यावेळी गोगावले यांनी शिवसेनेचे नेते माजी खासदार अनंत गीते, सुभाष देसाई यांच्यावरही टीका केली. अनंत गीते यांनी आपला स्वार्थ साधला असल्याचा आरोप गोगावले यांनी केला. 


दरम्यान, महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी घटनापीठासमोर करण्याचे आदेश सरन्यायाधीश रमण्णा यांच्या खंडपीठाने दिले होते.सरन्यायाधीश रमण्णा यांच्या निवृत्तीच्या काही दिवस आधी ही सुनावणी झाली होती. विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव प्रलंबित असताना  आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी करू शकतात का? या दरम्यान सभागृहाचे कामकाज कसे सुरू राहिल? राजकीय पक्षातील अंतर्गत लोकशाही आणि त्यात निवडणूक आयोगाची भूमिका आदी मुद्यांवर घटनापीठ सुनावणी करणार आहे. सुप्रीम कोर्टाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या निर्देशानंतर पाच सदस्यीय खंडपीठ स्थापन होणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: