पुणे : पुण्यातील एका बिझनेसमनने आपल्यावर 1981 मध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता, अशी तक्रार औंधमधील 54 वर्षीय महिलेने केली आहे. माजी नगरसेविका राहिलेल्या या महिलेने 36 वर्षांपूर्वी झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.


पुण्यातील बोपोडीमध्ये असलेल्या कार्यालयात आपण रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत होतो. त्यावेळी ऑटोमोबाईल्स इंडस्ट्रीतील संबंधित बिझनेसमनने आपल्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला, असा दावा तिने केला आहे. खडकी पोलिस स्थानकात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'पुणे मिरर' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

'मी पालक, मोठी बहीण आणि धाकटा भाऊ यांच्यासोबत राहत होते. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी मी दहावीनंतर शिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला. सांगवीतील एका खाजगी कंपनीत मी नोकरी करत होते. ऑगस्ट 1981 मध्ये मी बोपोडीतील ऑटोमोबाईल कंपनीमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून रुजू झाले.' असं तक्रारदार महिलेनं सांगितलं.

रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी दिल्यानंतरही आपल्याला स्वच्छतेची कामं करायला लावल्याचा दावा तिने केला आहे. 'तो मला अनेक वेळा सोबत बाहेर येण्याची जबरदस्ती करायचा. सप्टेंबर 1981 मध्ये त्याने एका रविवारी मला सोबत फिरायला येण्याची गळ घातली. खडकीतील जय हिंद थिएटरला येण्यास त्याने सांगितलं. मी तयार झाले. त्याने मला पिक अप केलं आणि तासाभराने आम्ही एका टेकडीवर पोहचलो. मला तो परिसर माहिती नव्हता. तेव्हा ही हनुमान टेकडी असल्याचं त्याने मला सांगितलं.' असं तक्रारदार महिलेने पुढे सांगितलं.

'त्याने मला टेकडीच्या टोकावर नेलं आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मी दिवसभर काहीच खाल्लं नसल्यामुळे बेशुद्ध पडले. जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा तो मला नको तिथे स्पर्श करुन माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत होता' असा दावा महिलेने केला.

महिला त्याला ढकलून लांबवर पळाली. त्याला मारण्यासाठी दगड शोधत होती, मात्र काही सापडलं नाही. अखेर कशीबशी ती खाली आली. 'त्याने मला एका स्पोर्ट्स क्लबमध्ये नेलं. मला बाहेर बसवलं आणि तासभर मित्रांबरोबर टेबल टेनिस खेळला. शेवटी दापोडी मार्केटमध्ये सोडून तो निघून गेला' असं ती सांगते.

'या घटनेची वाच्यता मी कुठेच केली नाही. दुसऱ्या दिवशी कामावरही गेले. पुन्हा स्टोअररुममध्ये त्याने माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर कर्मचाऱ्यांनी आम्हाला पाहिल्यामुळे मी सुटका करु शकले. मी त्याला जाब विचारला, तर त्याने माझ्यावरच चोरीचा आळ आणला' असं तिने सांगितलं.

'मी अनेक लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण माझी आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे कोणीच माझ्या मदतीला आलं नाही. 1986 मध्ये माझं लग्न झालं, आणि 1993 मध्ये आम्ही विभक्त झालो.' असं तक्रारकर्त्या महिलेने सांगितलं. पुढे तिचं आयुष्यच बदललं. 1992 मध्ये तिने नगरसेवकपद मिळवलं. वयाच्या 26 व्या वर्षी ती पुण्यातील सर्वात तरुण नगरसेविका ठरली होती.