पुणे : पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयामध्ये 'रिव्हिजिटींग गांधी' या चर्चासत्रामध्ये आयोजित करण्यात आलेलं महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचं भाषण रद्द करण्याचा निर्णय महाविद्यालयानं अचानक घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. पतित पावन आणि इतर काही संघटनांनी तुषार गांधी आणि अन्वर राजन यांच्या नावाला विरोध केल्याने या दोघांची या चर्चासत्रांमधली भाषणं रद्द करावी लागल्याचं मॉडर्न महाविद्यालयाचे मुख्य सचिव डॉक्टर गजानन एकबोटे यांनी म्हटलं आहे. मात्र पुण्यातील पतित पावन संघटनेने मात्र आपण या कार्यक्रमातील वक्त्यांच्या नावांना विरोध केला नसल्याचं म्हटलं आहे.

रिव्हिजिटींग गांधी या दोन दिवसांच्या चर्चसत्राचं आयोजन करण्यासाठी मॉडर्न महाविद्यालयाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दोन लाख रुपयांचं अनुदान मंजूर करून घेतलं होतं. quality improvement program या योजनेच्या अंतर्गत विद्यापीठाकडून कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी अशा प्रकारचा निधी महाविद्यलयांना दिला जातो. त्यासाठी कार्यक्रमाचं स्वरूप आणि रूपरेषा विद्यापीठाला कळवावी लागते. मॉडर्न महाविद्यालयाने पाठवलेल्या प्रस्तावाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मंजुरी दिल्यानंतर महाविद्याविद्यालयाने अचानक तुषार गांधी आणि अन्वर राजन यांना तुमची या चर्चासत्रातील भाषणं रद्द झाल्याचं सांगितलं. त्यासाठी पतित पावन संघटनेने विरोध केल्याचं कारण मॉडर्न महाविद्यालयाकडून देण्यात आलं.

पतित पावन संघटनेने मात्र मॉडर्न महाविद्यालयाच्या या दाव्याबद्दल कानावर हात ठेवले आहेत. आम्हाला या चर्चासत्राची माहितीच नव्हती. त्यामुळे आम्ही या चर्चासत्राला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही असं पतित पावन संघटनेनं म्हटलं आहे. तुषार गांधी यांना मॉडर्न महाविद्यालयाने हे संपूर्ण चर्चासत्रच रद्द झाल्याचं सांगितलं. मॉडर्न महाविद्यलयात आज रिव्हिजिटींग गांधी हे चर्चासत्र पार पडलं. डॉक्टर गजानन एकबोटे आणि इतर वक्ते त्यामध्ये सहभागी झाले होते. तुषार गांधी यांचं भाषण रद्द करावं लागल्याबद्दल राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त करत पुणे पोलिसांवर टीका केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.