औरंगाबाद : एकीकडे देश 2 ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करत असताना मध्य प्रदेशातील रेवा येथील गांधी भवनातील गांधीजींच्या अस्थी चोरीला गेल्याची घटना घडली. मात्र याप्रकरणी कोणत्याही राजकीय पक्षाने प्रतिक्रिया दिली नाही, याबाबत गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी खंत व्यक्त केली. याविषयी बोलताना तुषार गांधी यांना अश्रू अनावर झाले.


'गांधी : माणूस ते महात्मा' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ महात्मा गांधी मिशन संस्थेने आयोजित केला होता. तुषार गांधी यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केलं. 'कस्तुरबा : मला उमजलेल्या' या विषयावर तुषार गांधी यांचे व्याख्यानही झाले. यावेळी तुषार गांधींनी महात्मा गांधींच्या अस्थी चोरीला गेल्याच्या घटनेचा उल्लेख केला.


मध्य प्रदेशातील रेवा येथील गांधी भवनातील गांधीजींच्या अस्थी चोरी झाल्या. समाजकंटकांनी गांधीचींच्या फोटोखाली 'गद्दार'ही लिहीलं. या घटनेला तीन दिवस उलटून गेले आहेत, मात्र प्रत्येक गोष्टीवर आपलं मत मांडणाऱ्या राजकीय पक्षांनी या घटनेबाबत मौन बाळगल्याचे सांगताना तुषार गांधी यांना अश्रू अनावर झाले.



गांधीजींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न मुद्दाम केला जात आहे, असं तुषार गांधी यांनी म्हटलं. "नव्या भारतात महात्मा गांधी गद्दार आहेत. नव्या भारताला नवीन 'राष्ट्रपिता'ही मिळाले आहेत. त्यामुळे देशाला नवे राष्ट्रपिता मिळाले असतील तर गांधीजींना रिटायर करण्याची वेळ आली आहे. कारण नव्या भारताला त्यांची गरज नाही", अशी उपहासात्मक टीका तुषार गांधी यांनी केली.


काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचा 'फादर ऑफ इंडिया' असा उल्लेख केला होता. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील मोदींच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख 'फादर ऑफ अवर कंन्ट्री' असा केला होता.


Wishing the Father of our Country @narendramodi ji a very Happy Birthday - who inspires us to work relentlessly towards the betterment of the society ! #HappyBDayPMModiJi #HappyBdayPMModi #HappyBirthdayPM #happybirthdaynarendramodi pic.twitter.com/Ji2OMDmRSm


— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) September 17, 2019




संबंधित बातम्या