Ajit Pawar : पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या राज्य शिखर प्रशिक्षण केंद्रामुळे सहकार चळवळ मजबूत होईल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. प्रशिक्षण केंद्रामुळे बँकेतील संचालक, अधिकारी, कर्मचारी यांना चांगले प्रशिक्षण मिळून सहकार चळवळ अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या 'राज्य शिखर प्रशिक्षण केंद्र' उद्घाटन आणि उत्कृष्ट नागरी बँकांच्या सत्कार समारंभात अजित पवार बोलत होते. यावेळी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते, उपाध्यक्ष साहेबराव टकले, संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.


महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार चळवळीचे महत्वाचे योगदान आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील त्रुटी दूर करुन सहकार चळवळ टिकवण्याचे आणि वाढविण्याचे प्रामाणिक प्रयत्न गरजेचे आहे. नागरी सहकारी बँकांसमोर अनेक आव्हाने असली तरी त्यावर मात करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. प्रशिक्षणामुळे बँकांना दैनंदिन कामकाजात चांगला फायदा होईल. मावळ तालुक्यातील नियोजित प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीसाठी शासकीय जागा देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल असेही अजित पवार यांनी सांगितले.




ग्राहकाभिमुख आणि लोकाभिमुख व्हा


स्पर्धेच्या युगात नागरी सहकारी बँकांसमोर अनेक अडचणी असल्या तरी ग्राहकांचा विश्वास मिळवीत प्रगती साधता येईल. सहकारी संस्था ग्राहकाभिमुख आणि लोकाभिमुख व्हायला हव्यात. ग्राहकांना सेवा देताना व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन नव्या डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. बँकांच्या प्रशासनात पारदर्शकता आणून अधिक चांगली सेवा देण्यावर भर द्यावा. नागरी सहकारी बँकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाचे सर्व सहकार्य राहील, अशी ग्वाही देखील अजित पवार दिली.




सामान्य गुंतवणूकदारांचा विश्वास टिकेल अशी कामगिरी करा


देशपातळीवर होत असलेल्या सार्वजनिक बँकांच्या विलीनीकरणामुळे निर्माण होणारी पोकळी भरण्याची क्षमता नागरी सहकारी बँकांमध्ये आहे. या संधीचा फायदा घेतांना बँकेच्या कामकाजासाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे. सर्वसामान्य गुंतवणुकदारांचा विश्वास टिकेल अशी कामगिरी करण्यावर भर द्यावा. सहकारी सोसायट्यांचे नाबार्ड आणि राज्य शासनाच्या सहकार्याने संगणकीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचे पवार यांनी सांगितले. आबासाहेब शिंदे यांच्यासारख्या समर्पित कार्यकर्त्यामुळे महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजली. नव्या पिढीने त्यांचा आदर्श समोर ठेऊन सहकार क्षेत्रात काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.