पुणे :  पुणे शहरातून (Pune News)  कोकणात (Pune Konkan Route)  जाणाऱ्या लोकांसाठी महत्वाची बातमी आहे.  वरंधा घाट (Varandh Ghat)   आजपासून (26 जून)  बंद करण्यात आला आहे. भोरमार्गे महाडला (Pune - Bhor- Mahad)  जाणाऱ्या वरंध घाट मार्गावरील सर्व वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. पावसाळ्यातील संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाने  वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 


पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाट वाहतुकीकरता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. दुसरीकडे  हवामान खात्याचा रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना  हलक्या वाहनांसह घाटातील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे.  पावसाळ्यात घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात. या  पार्श्वभूमीवर संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला आहे. 


किती तारखेपर्यंत बंद असणार घाट?


वरंध घाट 26 जून ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत बंद राहणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी  आदेश काढले आहेत.  आठवड्यापूर्वी वरंध घाटातील वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळल्यानं घाटातील संरक्षक कठडा तुटून रस्ता खचल्याची घटना घडली होती . या घाटातील पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील रस्ता हा नागमोडी वळणाचा असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात. त्यामुळे संभाव्य जीवित व वित्त हानी टाळण्याच्या उद्देशाने हा घाट रस्ता अवजड वाहनांसाठी पावसाळा कालावधीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


कोणत्या पर्यायी मार्गाचा वापर करावा?


पुण्यावरुन कोकणात जाण्यासाठी वरंध घाट हा शार्टकट मार्ग  आहे. परंतु आता पर्यायी मार्ग वाहनधारकांना वापरावा लागणार आहे. वाहनधारकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगाव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे  आणि पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे असा मार्ग वापरावा. तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड- कोल्हापूर” असा मार्ग वापरावा.


पावसाळ्यासाठी खबरदारी


पुण्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी पावसामुळे आपत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्यातच दरडी कोसळल्याच्या घटना सातत्याने घडताना दिसतात. त्यात अनेकदा जीवितहानी होते. पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि नागरिकांचं नुकसान होऊ नये, यासाठी सगळ्या स्तरावरुन दरवर्षी प्रयत्न केले जातात. वरंध घाटाबरोबरच पुण्याजवळील काही भीतीदायक किंवा आपत्तीजनक पर्यटन स्थळेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल.  


हे ही वाचा :


तिलारी घाट अवजड वाहतुकीसाठी बंद, अपघाताची भीती असल्यानं 31 ऑक्टोबरपर्यंत वाहतूक बंद