Pune Koyta gang : पुणे शहरात सगळीकडे कोयता गॅंगने (Koyta gang) धुमाकूळ (Pune Crime News) घातला आहे. याच कोयता गॅंगवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. पोलीस दलातील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकार्‍यांची पोलीस आयुक्तालयात बैठक झाली. या बैठकीत हे आदेश देण्यात आले आहेत. कोयता गॅंगला रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करणार असल्याचंही ते म्हणाले.


पुण्यात सर्रास कोयते उगारले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात कोयता गॅंगची दहशत सर्रास सुरु आहे. शहरातील अनेक मध्यवर्ती तसेच उपनगरात तरुणांकडून भरदिवसा कोयते उगारले जात आहेत. या तरुणांमध्ये अनेक अल्पवयीन तरुण असून गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांमध्ये भीती पसरली आहे. सामान्य नागरिक तसेच व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी लुटण्याचे प्रयत्न देखील या तरुणांकडून केले जात आहेत. मात्र पुणे पोलिसांकडून कुठलीही कठोर कारवाई या तरुणांवर केली जात नसल्याचं चित्र प्रखरतेने जाणवत आहे. शहरात अनेक परिसरात कोयता गॅंगने दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे यावर पोलीस कारवाई कधी करणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला होता. त्यामुळे पोलिसांनी आता अशा घटना रोखण्यासाठी  उपाययोजना करणार आहेत. 


मोक्का गुन्हेगारांविरोधात कारवाई


शहरात गुन्हेगारीचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. ही गुन्हेगारी थांबवण्याचं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. त्यामुळेच पुणे पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. मोक्का आणि सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई होणार आहे. शिवाय पाच ते सहा वर्षात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांची लिस्ट काढून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 


अल्पवयीन गुन्हेगारांचं काय?


कोयता गॅंगमध्येच नाही तर पुण्यात अनेक गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यामुळे या मुलांना रोखण्याचं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन या अल्पवयीन गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासोबतच अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. कारवाई आणि समुपदेशन दोन्हीच्या माध्यमातून मुलांवर योग्य कारवाई करणार आहे. त्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार असल्याचं देखील आयुक्तांनी सांगितलं. पुण्यातील वाढती गुन्हेगारी पाहता पुणे पोलीस अॅक्टिव्ह होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. येत्या काही महिन्यातच गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा घालू आणि नागरिकांना गुन्हेगारी कमी झाल्याचं लवकरच दिसेल, असंही आयुक्त म्हणाले आहेत.