पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये प्रेमीयुगलांचे वाद, त्यातून होणाऱ्या हत्या,खून आणि टोकाचं पाऊल उचलण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडताना दिस आहेत. अशातच क्षुल्लक कारणावर झालेला वाद आणि आलेला रागाच्या भरात एका प्रेमीयुगुलाने डिंभे धरण्याच्या डाव्या कालव्यातील पाण्यात उड्या मारल्याची घटना समोर आली आहे. दोघांही अद्याप बेपत्ता आहेत. ही घटना पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील विठ्ठलवाडी-टाकेवाडी यादरम्यान घडली आहे. पोलिसांनी घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, कविता सुनील पारधी आणि पप्पू लक्ष्मण खंडागळे अशी बेपत्ता झालेल्या उडी घेणाऱ्या दोघांची नावे आहेत.
नेमकं काय घडलं?
पहाटेच्या सुमारास कविता पारधी, पप्पू खंडागळे आणि त्यांच्यासोबत कविताच्या मामाची 13 वर्षांची मुलगी दिव्या राजाराम काळे हे तिघे दुचाकीवरून टाकेवाडी येथील ठाकर वाडीकडे येथे जात होते. टाकेवाडी डाव्या कालव्या जवळ आल्यानंतर कविता पारधी आणि पप्पू खंडागळे या दोघांमध्ये कुठल्या तरी मुद्यावरून भांडण झालं. भर रस्त्यावरच दोघांचा वाद झाला.
त्यानंतर रागाच्या भरात कविता पारधीने कालव्यातील पाण्यात उडी मारली. तिला वाचवण्यासाठी पप्पू खंडागळे यानी देखील पाण्यात उडी घेतली. दोघांनाही पोहोता येत असल्याने ते बाहेर येतील, असं दिव्याला वाटलं. पण बराच वेळ गेल्यानंतरही दोघे दिसेना त्यामुळे दिव्या काळे घाबरली आणि ती जवळच राहणाऱ्या रामदास भिमाजी चिखले यांच्या शेडमध्ये अंधारात जाऊन बसली. सकाळी शेतकरी रामदास चिखले शेडमध्ये आल्यानंतर त्यांना तिथे ती मुलगी दिसली. तिला तिचे नाव विचारले आणि इथे कशी आली ते विचारल्यानंतर तिने सर्व हकीकत सांगितली.
त्यानंतर रामदास चिखले यांनी गावातील लोकांना या घटनेची माहिती दिली. गावाचे पोलीस पाटील आणि इतर ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जिथून उडी घेतली तिथून जवळपास सात ते आठ किलोमीटर अंतरात डाव्या कालव्याची पाहणी केली. पण पारधी आणि खंडागळे दिसले नाहीत. कविता पारधी आणि पप्पू खंडागळे यांचा कालव्यात शोध सुरू आहे. मात्र पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने अडचणी येत आहेत. दरम्यान उडी घेतलेल्या दोघांचं भांडण का झालं? कशावरून झालं याबाबत पंचक्रोशीत चर्चा सुरू होती. पोलीस पाटील उल्हास चिखले यांनी मंचर पोलिसांना झालेली घटना कळवली. मंचर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एस आर मांडवे, संदीप कारभळ, पोलीस हवालदार संजय नाडेकर आणि पोलीस योगेश रोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
डिंभे डाव्या कालव्याला 400 क्युसेक्स वेगाने पाणी वाहत आहे. त्यामुळे बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध घेण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. यासाठी मंचर पोलीस ठाण्याने घोडेगाव तहसीलदारांना पत्र देऊन कालव्यातील पाणी कमी करण्याची मागणी केली आहे. या मागणी वरून डिंभे धरण यांना तहसील विभागाने पाणी कमी करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार पाणी कमी केले जाईल. त्या नंतर शोध घेतला जाणार आहे.