Pune Manache Ganpati :  गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातील लोक पुण्यात (Pune) दरवर्षी येत असतात. ढोल ताशाच्या गजरात गणपतीचं स्वागत केलं जातं. तर 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असं म्हणत गणपतीचं विसर्जन केलं जातं. आता पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत आधी विसर्जन कोणी करायच हा वाद न्यायालयात पोहचलाय. पुण्यातील मानाचे समजले जाणारे पाच गणपती मंडळ म्हणजे श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती या सर्व मंडळांना याचिकेतून प्रतिवादी करण्यात आले आहे. यामुळे पुण्यातील मानाच्या गणपतींचा क्रम कोणी आणि कधी ठरवला? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला देखील इतिहास आहे. जाणून घेऊयात पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा इतिहास...


1893 मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झाली. त्याच्या दुसऱ्याचं वर्षी म्हणजेच 1894 मध्ये आधी कोणत्या मंडळाच्या गणपतीचं विसर्जन करायचं? यावरुन वाद निर्माण झाला होता. लोकमान्य टिळकांपर्यंत हा वाद पोहचला आणि टिळकांनी मानाच्या गणपतींचा आणि विसर्जनाचा क्रम ठरवून दिला होता.  


टिळकांनी घालून दिला क्रम 
आधी कोणत्या मंडळाच्या गणपतीचं विसर्जन करायचं? हा प्रश्न पुण्यातील मंडळांनी लोकमान्य टिळकांसमोर मांडला होता. त्यावेळी लोकमांन्य टिळकांनी एक क्रम लावून दिला. पुण्याचा ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचं विसर्जन सर्वात आधी होईल, असं टिळकांनी सांगितलं होतं. त्यानंतर पुण्याची ग्रामदैवता असलेल्या तांबडी जोगेश्नवरी मंडळाचं विसर्जन होईल. या दोन्ही मंडळांचे विसर्जन झाल्यानंतर इतर मंडळाचे विसर्जन केले जाईल, असं टिळकांनी सांगितलं होतं. हा क्रम आज देखील पाळला जातो. या विषयाची माहिती इतिहास आभ्यासक मंदार लवाटे यांनी एबीपी माझाला दिली. 


काय आहे इतिहास? 


मंदार लवाटे म्हणाले,'गणेशोत्सवाला मोठा इतिहास आहे. पेशवे काळामधील कागदपत्र हे सासवड जवळ असणाऱ्या गराडे गावामध्ये आहेत, ते मी पाहिले आहे. त्यामध्ये असा उल्लेख आहे की, कोणत्या गणपतीचं विसर्जन कधी होणार. त्यामध्ये लिहिलं आहे की, गावातील पाटलांच्या गणपतीचं विसर्जन आधी व्हायचं. म्हणजे पेशवे काळात देखील गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीची प्रथा होती. जेव्हा पुण्यात गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास सुरुवात झाली तेव्हा कोणत्या गणपतीचे विसर्जन हे आधी होईल? असा प्रश्न निर्माण झाला. 1953 मधील एका पुस्तकामध्ये असा उल्लेख आहे की, याबाबत कोतवाल चावडी बैठक चालू होती. तेव्हा वाद वाढेल असं वाटत होतं त्यामुळे ब्रह्मगिरी बुवा यांनी टिळकांची भेट घेऊन या विषयाबाबत सांगितलं. तेव्हा टिळकांनी गणपती मंडळाच्या गणपतींच्या विसर्जनाचा क्रम लावून दिला.


टिळक पंचांग आणि दाते पंचांगानुसार गणपतींची स्थापना


'जवळपास 100 वर्षांपूर्वी पुण्यामध्ये टिळक पंचांग आणि दाते पंचांग यांच्यानुसार गणपतींची स्थापना करण्यात येत असे. दोनवेळा असं झालं की, काही गणपतींची स्थापना एक महिना आधी झाली आणि काही गणपतींची स्थापना एक महिन्यानंतर झाली. त्यामुळे दाते पंचांगानुसार ज्या गणपतींची स्थापना झाली, त्यामध्ये सगळ्यात पहिला गणपती हा जोगेश्वरीचा गणपती होता. त्यामुळे इतिहासात असं एकदा झालं की एकावर्षी एका विसर्जन मिरवणुकीचं नेतृत्व जोगेश्वरी गणपतीनं केलं तर त्याच वर्षी  दुसऱ्या विसर्जन मिरवणुकीचं नेतृत्व कसबा गणपतीनं केलं. कारण  टिळक पंचांग आणि दाते पंचांग यांच्यामध्ये फरक होता. आता तसं होतं नाही', असंही मंदार लवाटे यांनी सांगितलं.


आजही टिळकांनी घालून दिलेल्या क्रमानेच गणपतींचे विसर्जन होते


जवळपास 130 वर्ष झाली आजही टिळकांनी घालून दिलेल्या क्रमानेच गणपतीचं विसर्जन होतं. भाऊ रंगारी मंडळाचे काशिनाथ ठकूजी जाधव हे गणपती विसर्जन मिरवणूक व्यवस्थित व्हावी याकडे लक्ष देत होते. टिळक पुतळा ते टिळक चौक या परिसरात येरझाऱ्या घालून मिरवणूक व्यवस्थित होत आहे की नाही याकडे लक्ष देत होते. 


पाहा व्हिडीओ: