पुणे: पुण्यात पोलिस कर्मचारीच सुरक्षीत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोम्बींग ऑपरेशन करून घरी परत निघालेल्या एका पोलिसाला सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात चौघा दारुड्यांनी बेदम मारहाण करत, त्यांचा मोबाईल हिसकावला. संबंधीत पोलिसाने याबाबत चतुःश्रृंगी पोलिसाकडे तक्रार दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दारुड्यांना अटक केली आहे. मात्र, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर हा प्रकार जाताच, चतुःश्रृंगी पोलिसांनी तीन दिवसानंतर अखेर गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत जाधव (वय.42,रा.रामोशीवाडी) यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी रुपेश मांजरेकर,अनिकेत घोडके आणि अभिजित डोंगरे या तिघांना अटक केली आहे. त्यांच्या अन्य एका साथीदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जाधव यांना मारहाण करण्यात आल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे सहकारनगर पोलिस ठाण्यात नेमणूकीस आहेत. ते रामोशीवाडी एस.बी.रोड परिसरात ते वास्तव्यास आहेत. गुरुवारी (दि. 13) मध्यरात्री आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोम्बिंग ऑपरेशन संपवून घरी परत निघाले होते. रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात आले असता, चौघेजण त्यांना रस्त्यावर एका रिक्षात मध्यप्राशन करताना दिसले. ते चौघे गोंधळ घालत होते. जाधव यांनी त्यांना हटकले आणि गोंधळ घालत असल्याचा जाब विचारला. त्याचा त्यांना राग दारूड्यांना आला आहे. त्यांनी जाधव यांना धमकावत आम्हाला माहिती आहे तू पोलिस आहेस, परंतू तू इथला पोलिस नाहीस, त्यामुळे तु आम्हाला शिकवू नको असे म्हणत दम भरला. त्यानंतर चौघांनी जाधव यांना रिक्षात डांबून बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली.
ठार मारून टाक त्या पोलिसाला...
तो दगड उचल आणि ठार मारून टाक त्या पोलिसाला, असे म्हणत आरोपींनी जाधव यांच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. आपली सुटका करून घेतल्यानंतर जाधव यांनी मोबाईलमध्ये आरोपींचे फोटो काढले. तो मोबाईल त्यांनी हिसकावून घेतला. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे जाधव हे पोलिस असल्याची माहिती असताना देखील निर्ढावलेल्या गुन्हेगारांप्रमाने चौघांनी त्यांना मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर जाधव यांनी ओळखीच्या चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील एका अधिकार्याला फोन करून आपल्याला मारहाण झाल्याचे सांगितले. ते सांगत असताना, सर्व प्रकार समोरील अधिकार्यांना ऐकू जात होता. तरी चौघे जाधव यांना मारहाण करत होते.
रात्री पहाटे पाच वाजेपर्यंत ते ससून रुग्णालयात
काही वेळानंतर चतुःश्रृंगी पोलिस घटनास्थळी पोहचले तोपर्यंत चौघे तेथून फरार झाले होते. जाधव यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करून घेण्यास सांगितले. त्यावेळी तेथील अधिकार्यांनी आता नको उद्या पाहू असे म्हणत वेळ मारून घेतली, जाधव यांनी माझी तक्रार तर दाखल करून घ्या साहेब असे म्हटल्यावर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. त्या रात्री पहाटे पाच वाजेपर्यंत ते ससून रुग्णालयात होते. दुसर्या दिवशी परत जाधव चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी तेथील अधिकार्यांना भेटून कैफियत मांडली. कोर्टाचे काम असल्याचे सांगून हे अधिकारी निघून गेले. जाधव तेथेच ताटकळत उभे होते. शेवटी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना त्यांना भेटवण्यात आले, त्यांनी आपल्या वरिष्ठांच्या कानावर घालतो, तसेच दोन दिवसावर तरंग कार्यक्रम आहे, उगीच भलती भानगड नको, आपले कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. आरोपींना पकडून तुमच्यासमोर उभे करतो असे म्हणून त्यांची बोळवण करण्यात आली. त्यानंतर तर पोलिसांची हद्दच झाली. त्यांनी आपल्या वजनदार माणसाचा वापर करत मारहाण झालेल्या जाधव यांना प्रकरण मिटवून घेण्याचा अजब सल्लाच दिला.
दाद कोणाकडं मागायची?
हे तेच वजनदार व्यक्तीमत्व आहे की, जे आपल्या प्रभावी पदाचा वापर करून पोलिस ठाण्याच्या हद्दीत चौफेर उधळण करीत असतात. यापुर्वी देखील त्यांचे अनेक कारणाने समोर आले असताना, वरिष्ठांनी त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांना आता तरी अंकुश लागणार आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. एका पोलिस कर्मचार्याला चौघेजण बेदम मारहाण करत असतील, ते ही पोलिस असल्याचे माहिती असताना कारण काय तर रात्रीच्या वेळी रस्त्यावर गोंधळ घालत असताना हटकले म्हणून पोलिसाने तक्रार केल्यानंतर देखील आरोपींना धडा शिकवण्याचे सोडून पोलिसच जर पोलिसाला वाद मिटवून घेण्याचा सल्ला देत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायाची काय अपेक्षा करावी हा खरा सवाल आहे.