Pune Crime News : पुण्यात तरुणांच्या (pune crime news )आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. सोशल मीडियावरुन होणारी पिळवणूक, सेक्सटॉर्शन आणि वेगवेगळ्या व्यसनाच्या आधिनहोऊन त्यातून निर्माण होणारे वाद तरुणांना टोकाचं पाऊल उचलण्यासाठी भाग पाडत असल्याचं मागील काही दिवसांपासून समोर आलं आहे. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. (Suicide) संशयाने मित्राने मारहाण केल्याने आणि मैत्रिणीने अमली पदार्थांचे सेवन करण्यास भाग पाडल्याने 21 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येनंतर 20 दिवसांनी पालकांनी तिच्या कॉलेजची वही उघडल्यानंतर या आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलं आहे. आत्महत्येचं कारण पाहून कुटुंबियांनां चांगलाच धक्का बसला आहे. 


हरलीन कौर असं या 21 वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. या तरुणीने मैत्रिणीने अमली पदार्थांचे सेवन करण्यास भाग पाडल्याने तसेच मित्राने संशय घेऊन मारहाण केल्याने गळफास लावून आत्महत्या केली. 1 फेब्रुवारीला ही घटना घडली. हरलीनला रात्रीच्या जेवणासाठी बोलवायला तिचे वडील गेले. मात्र बराच वेळ झाला तरी ती दरवाजा उघडत नव्हती. अखेर त्यांनी दरवाजा तोडला असता हरलीन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबियांना हादरा बसला. लेकीने आत्महत्या केल्याने तरुणीचे कुटुंबीय घाबरलेल्या अवस्थेत होते. तिच्या अचानक जाण्याने कौर परिवारात शोककळा पसरली होती. 


वहीत सापडलेल्या चिठ्ठीतून मृत्यूचा उलगडा


या सगळ्या घटनेनंतर कौर कुटुंबिय काही कामासाठी अमृतसरला गेले होते. दोन-तीन दिवसांत पुण्यात परतले. त्यानंतर त्यांनी हरनील हिच्या सामानाची पाहणी केली. तिच्या वह्या, पुस्तकं चाळले या वहीत एक आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात तिने आत्महत्येचं कारण लिहिलं होतं. जवळच्या मैत्रिणीने गांजा मारणं आणि प्रेमसंबंधाच्या संशयातून मित्राने मारहाण केली. तिचा मोबाईलदेखील घेतल्याचं आणि वारंवार धमकवल्याचं त्या चिठ्ठीत लिहिलं होतं. ही चिठ्ठी वाचताच तिच्या आई-वडिलांना धक्का बसला, तिच्या आई-वडिलांनी थेट पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी युवतीची मैत्रीण आणि एका मित्राच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी हरलीनचा मित्र साईराज आणि मैत्रीण उत्कर्षा ससाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरलीन हॉटेल व्यवस्थापन महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिने 1 फेब्रुवारी रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.  


मुलांच्या संगतीकडे लक्ष ठेवणं गरजेचं


सोशल मीडियाच्या काळात सध्या तरुण तरुणी मोबाईलवर काय बघतात. याकडे जेवढं लक्ष ठेवण्याची गरज आहे. तेवढीच गरज आपल्या मुलांचा मित्रपरिवार नेमका कोण आहे आणि ते कसे आहेत. याकडेदेखील पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे.