Pune Crime : अनेक समाजामध्ये मुलीच्या घरच्यांना लग्नात हुंडा देण्याची पद्धत असते. हाच हेतू साधत 40 वर्षीय महिलेने तीन वर्षांच्या मुलीचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्य़ाच्या कोरेगाव परिसरातून या मुलीचं अपहरण करुन तिला दौंड तालुक्यातील श्रीगोंदा गावात घेऊन जाणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.



उषा नामदेव चव्हाण (वय 40, रा. कापसे वस्ती, श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. उषा ही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तब्बल पाच दिवस पोलिस या महिलेचा शोध घेत होते. 250 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि महिलेच्या हातात असलेल्य़ा पिशवीच्या नावावरून पोलिसांनी थेट महिलेचे घर गाठले आणि कोरेगाव पार्कच्या पोलिसांनी महिलेला अटक केली.


काय आहे प्रकरण?


कोरेगाव पार्क परिसरात एक 23 वर्षाची महिला फुगे विकत असते.23 मे रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ढोले पाटील रोडवरील एका रिक्षात झोपली होती. त्यावेळी तिच्या कुशीत असलेल्या तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले होते. तीन-चार दिवस मुलीचा शोध घेतल्यानंतर अखेर 25 मे रोजी महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेला संपुर्ण प्रकार सांगितला आणि तक्रार दाखल केली.घटनेचं गांभीर्य बघत पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे हालवली. त्या परिसरातले सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या तपासनीत सहायक निरीक्षक प्रेरणा कुलकर्णी यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी महिला अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. तब्बल 5 दिवसांनी श्रीगोंदा येथून उषा चव्हाण या सराईत महिलेला पकडण्यात यश आले.


अटक झालेली महिला उषा चव्हाण हीला दोन मुले व दोन मुली आहेत. तिच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून लग्नात तिने 30 हजार रुपये हुंडा घेतला होता. त्यांच्या समाजामध्ये मुलीचे लग्न करताना मुलाच्या वडिलांकडून हुंडा घेण्याची प्रथा आहे.या कारणासाठी ती लहान मुलीला पळवून नेत तिला भिक्षा मागण्यासाठी लावते तसंच तिचे लग्न करताना हुंडा मिळावा यासाठी ही महिला मुलींचं अपहरण करते.