पुणे : "जयंत पाटील शांत स्वभावाचे आहेत, मीच उलट तापट स्वभावाचा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील राज्याच्या मुख्य सचिवांवर संतापले या बातम्यांमध्ये तथ्य नाही. काही वेळा महत्वाच्या विषयांवरुन लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी असं केलं जातं." असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

  


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर संतापल्याचं वृत्त होतं. त्यावर अजित पवार म्हणाले की, मी नाराजी स्पष्टपणे तोंडावर सांगतो. मला कोणत्या अधिकाऱ्याला बोलायचं झालं तर त्याला बाजूला घेऊन नाराजी सांगेन. जर विषय माझ्या पक्षाच्या नेत्याबद्दल तर तेच उत्तर देतील. परंतु जयंत पाटील सीनियर नेते आहेत. जयंत पाटील यांनी अनेक खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांचा स्वभाव अतिशय शांत आहे. अधिकाऱ्यांकडून काम कसं करुन घ्यायचे हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. मीच उलट तापट स्वभावाचा आहे, कडक बोलणारा. ते माझ्या उलट स्वभावाचे आहेत. ज्या बातम्या आल्या आहेत त्यामध्ये तथ्य नाही. काही वेळा महत्वाच्या विषयांवरुन लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी असं केलं जातं.


मंत्रिमंडळ बैठकीत काय झालं?


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर संतापले. मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झालेल्या जलसंपदा विभागाची कामांची फाईल मुख्य सचिवांनी पुन्हा वित्त विभागाकडे पाठवल्यामुळे जयंत पाटील नाराज झाल्याचं म्हटलं जात होतं. मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा विभागाचा प्रस्ताव मंजूर होऊन त्याचे मिनिट्स मंजूर करण्यात आले होते, असे असताना ती फाईल वित्त विभागाकडे पाठवल्याने जयंत पाटील यांनी जाहीरपणे मुख्य सचिवांबद्दल नाराजी केली. इतकंच नाही तर नाराज जयंत पाटील यांनी 'असं असेल तर जलसंपदा विभागाचं बंद करुन टाका', असे संतप्त वक्तव्यही केलं. याशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केलेल्या कामांबद्दल असं होत असेल तर मंत्रिमंडळाच्या वर कोण आहे का? असा सवालही जयंत पाटील विचारला.