पुणे: पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर थेट तोडफोड केली. जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावं, अशी काही आंदोलकांची मागणी होती. मात्र समन्वयकांनी आधीच निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवलं होतं. दुसऱ्या एका गटाने तोडफोड केली, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी एबीपी माझाला दिली.


जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन न स्वीकारल्याने हा राडा झाल्याचा दावा मराठा मोर्चातील आंदोलकांनी केला. मात्र याबाबत एबीपी  माझाने जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी हा आरोप फेटाळला.

जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

जिल्हाधिकारी म्हणाले, “निवेदन दिल्यानंतर मला वाटलं आंदोलन संपलं. कारण मला कळवण्यात आलं होतं की आम्ही दोन तास ठिय्या आंदोलन करणार आहोत. त्यामुळे हे आंदोलक निवेदन दिल्यानंतर शांतपणे जातील, अशी माझी धारणा होती. निवेदन दिल्यानंतरही आंदोलक दहा मिनिटं, अर्धा तास थांबू शकतील हा ही विचार होता. पण जाण्यापूर्वी काही तरुण मुलांनी  हल्ला करत गेट तोडलं. तोपर्यंत मीडियात कलेक्टरने निवेदन न स्वीकारल्याने तोडफोड झाली असं वृत्त आलं जे चुकीचं होतं.”

यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना विचारण्यात आलं की, आंदोलकांची मागणी होती की तुम्ही खाली येऊन निवेदन स्वीकारावं, जे तुम्ही मान्य केलं नाही?

त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले, “मी आंदोलनापूर्वीच सर्व माहिती घेतली होती. निवेदन  कसं देणार आहेत? कोणाला खाली पाठवायचं आहे? कोण कोण कार्यालयात येतील? याबाबतची माहिती मी मराठा मोर्चा समन्वयकांकडून घेतली होती. दोन दिवस मी सतत त्यांच्या संपर्कात होतो. दोन दिवसांपूर्वी दोन तासांची बैठकही घेतली होती. पण मला असं कुणीही सांगितलं नव्हतं की खाली येऊन आमचं निवेदन स्वीकारा किंवा आमच्यात येऊन बोला, असं अजिबात कुणी सांगितलं नव्हतं.

मात्र एका गटाने नंतर हिंसक वळण घेतलं. शेवटी जिल्हाधिकारी म्हणून मी त्यांच्याशी संवाद साधत होतो, त्यांची निवेदन स्वीकारत होतो, पण मोठ्या जमावात जाऊन जिल्हाधिकारी काय करणार? पण मी माझा संवाद कायम ठेवला होता. जिल्हाधिकारी खाली आले नाहीत हे म्हणणं चुकीचं आहे.

मी नेहमीच विनंती करत आलो आहे की आंदोलन शांततेत करा. मला आज दिवसभरात जमाव हिंसक होतोय असं कुठेही जाणवलं नाही. मी सातत्याने सर्वांच्या संपर्कात होतो. पण एक गट हिंसक झाला आणि त्यांनी तोडफोड केली.

18-20 वर्षांची मुलं होती, त्यांनी तोडफोड केली. पोलिसांनी चांगला बंदोबस्त ठेवल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात होती. पण या यंग मुलांनी तोडफोड केली.

मी निवेदन स्वीकारल्यानंतर 5-10 मिनिटातच तोडफोड झाली. महत्त्वाच्या समन्वयकांमार्फत मी निवेदन स्वीकारलं. त्यावेळी त्यांच्यासोबत 15-20 महिला, तेव्हढेच पत्रकार होते. पण जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारलं नाही यामध्ये तथ्य नाही, असं स्पष्टीकरण जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलं.



महाराष्ट्र बंद : पुण्यात आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड 

महाराष्ट्र बंद LIVE : नाशिकमध्ये मराठा आंदोलकांच्या दोन गटात हाणामारी