Punyeshwar Temple And Mosque Issue: पुण्यातील पुण्येश्वर (Punyeshwar temple)  आणि नारायणेश्वर  (Narayaneshwar temple) मंदिराचा वाद आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने तात्काळ या दोन्ही ठिकाणी उत्खनन सुरू करून तिथं पुन्हा मंदिर उभारावीत, अशी पुन्हा एकदा मनसेने (MNS) मागणी केली आहे.  हे मंदिर कसबा (Kasba peth) पेठ परिसरात आहे. त्यामुळे नव्याने निवडून आलेले आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra dhangekar) यांनीही याचा इतिहास समजून घ्यावा आणि त्यांनीही यासंदर्भात विचार करावा असंही आवाहन मनसेने धंगेकरांना केलं आहे. 


पुण्येश्वर आणि नारायणेश्वर  या दोन पुरातन मंदिराच्या बाबत मनसेने केलेल्या मागण्या आणि कारवाईची माहिती देणारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सरचिटणीस अजय शिंदे आणि मनसेचे बाकी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यासोबतच मनसेचे वकिल योगेश देशपांडेदेखील उपस्थित होते. 


अजय शिंदे म्हणाले की, औरंगजेबच्या सत्ता काळातच हिंदू मंदिर (Temple) पाडून तिथं दर्गा  (MOSQUE) आणि मशिद बांधल्या गेल्यात. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिर देखील त्याच काळात पाडली जाऊन तिथे दर्गा उभारले गेलेत. सरकारने तात्काळ या दोन्ही ठिकाणी उत्खनन सुरू करून तिथं पुन्हा मंदिरं उभारावीत, अशी आमची मागणी आहे. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरासाठी मनसेचा पूर्वीपासूनच लढा सुरू आहे. पूर्वी या ठिकाणी हिंदू मंदिर होती तसे प्राचीन अवशेष आणि पुरावेही सापडले आहेत. मुघल काळात तिथं अतिक्रमण होऊन दर्गा बांधले गेले आहेत ते दर्गे पाडलेच गेले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.


हा लढा धार्मिक नाही आहे. दर्गा खोदकाम केलं त्यावेळी मंदिराचे अवशेष सापडले होते. पुरातत्व खात्याच्या अहवालातही यासंदर्भात नमूद केलं. त्यामुळे हा लढा अजिबात धार्मिक नसल्याचं मनसेचे वकिल योगेश देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यावर राज्य सरकार आता कोणता निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


तज्ञांचं मत काय?


या संदर्भात इतिहासकार संजय सोनावणी यांनी अधिक माहिती दिली. 10 वर्षांपूर्वी तिथे मशिद होती. त्याचं खोदकाम करताना भूमिगत गटाराचे अवशेष मिळाले. त्या गटाराच्या अवशेषाला किंवा विटाच्या कमानीला मंदिराचे अवशेष म्हणून जाहीर करायचं हा असा उपद्व्याप दुर्देवाने केला जात आहे. त्या ठिकाणी दर्गा होता. मंदिरं असल्याचा प्रश्नच येत नाही. धार्मिक पोथीतसुद्धा याचा उल्लेख नाही. त्यासाठी वाद निर्माण करण्याची काहीच गरज नाही आहे.