Pune Rain: पावसाळा आला की पुण्यातील माळीणवासीयांचे डोळे पाणावतात, आता माळीण (Malin Gaon) प्रमाणेच त्या लगतच्या पसारवाडीत भूस्खलनाची भीती व्यक्त केली जाती आहे. गावातील डोंगराला भेग पडली आहे, अशातच प्रचंड पाऊस कोसळत आहे. त्यामुळं नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. या डोंगराच्या वर पाच-सहा कुटुंब राहत आहेत. हे रहिवाशी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र ते होत नसल्यानं त्यांना जीव मुठीत घेऊन जगावं लागत आहे.


माळीण (Malin Gaon) लगतच्या पसारवाडी गावातील डोंगराची माती हळूहळू वाहत आहे, डोंगराची कडा सैल होत असल्याचं दिसून येतं आहे. माळीण परिसरातील अनेकांना आपला जीव मुठीत धरून जगावं लागतं आहे. अशातच जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शहर परिसरातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.


माळीण गावाने सकाळ पाहिलीच नाही...


2014 मध्ये माळीणमध्ये (Malin) दरड कोसळल्याने संपूर्ण गाव गाडलं गेलं होतं. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे एक आदिवासी भागातील गाव. पुण्यातून 75 ते 80 किमी अंतरावर डिंभे धरणाच्या परिसरात हे गाव वसललं होतं. त्यावेळी साधारण त्या गावाची लोकसंख्या 750 च्या आसपास असावी. 30 जुलै 2014 रोजी पहाटेच्या वेळी डोंगराचा कडा खाली आला आणि त्यात 44 हून अधिक घरं नागरिकांसह गाडली गेली. 


त्यात पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी जनावरे यांच्यासह सर्वच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. त्यांना बुधवारची सकाळ पाहताच आली नाही. एका क्षणात होत्याच नव्हतं झालं. एसटी चालकामुळे ही घटना सर्वांना समजली. मुसळधार पाऊस सुरु असतानाच ही दुर्घटना घडली. दिवस-रात्र त्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. सहा दिवसात जवळपास 151 मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला घरातील व्यक्तीही जिवंत नव्हत्या. प्रशासनाचे त्यांचे अंत्यविधी केले. डोंगर कोसळून गाव गाडल्याची घटना राज्यातील पहिलीच घटना होती. या घटनेनंतर राज्य आणि केंद्र सरकारने ही घटना राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर केली. सरकारने माळीण गावाचं पुनर्वसन केलं. मात्र आता पुन्हा एकदा आजूबाजूच्या गावात भीतीचं वातारण निर्माण झालं आहे.


पुण्यात पावसाचा रेड अलर्ट


आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये घाट भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने पुढील 4 दिवस राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज (Heavy Rain) वर्तवला आहे. घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.