पुणे : भारत पाकिस्तानच्या हायव्होल्टेज सामन्यात भारतानं बाजी मारली. त्यानंतर (Pune news) पुण्यात अनेक ठिकाणी मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. याच जल्लोषात पोलीस आणि नागरिकांमध्ये चांगलीच अरेरावी झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील नारायण पेठेत मोठी स्क्रिन लावून सामना बघितल्यानंतर नागरिकांना जोरात जल्लोष सुरु केला. त्यावेळी पोलीस नारायण पेठेत आले आणि अरेरावी करायला सुरुवात केल्याचा आणि लाठीचार्ज आरोप नागरिकांनी आणि माजी नगरसेवक राजेश येनपुरे यांनी केला आहे. मात्र या संदर्भात पोलिसांना विचारलं असता अरेरावी नाही तर गैरसमज झाल्याचं त्यांनी सांगितलं.


माजी नगरसेवक राजेश येनपुरे यांनी सांगितल्याप्रमाणे, नारायण पेठेत नागरिकांसाठी भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे प्रसारण सुरू होतं. अनेक नागरिक, विद्यार्थी सामन्याचा आनंद घेत होते. त्या वेळी विश्रामबाग पोलीस स्टेशनमधील पोलीस आणि त्याच्या टीमने नागरिकांवर लाठीमार केला. त्यांची तब्येत बरी नसल्याने ते 2 दिवस घरी झोपून होतो. त्यावेळी घाबरलेले नागरिक आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे जाऊन हा सर्व प्रकार सांगितला. ते म्हणाले की, त्या पोलीस अधिकाऱ्याला माझा रुद्रावतार दाखवावा लागला. पोलिसांची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असे पोलिसांनी सांगितलं. मात्र नागरिक आणि पोलीस या दोघांमध्ये चांगलीच अरेरावी झाल्याचं दिसून आलं.


पोलिसांकडून स्पष्टीकरण


या प्रकरणासंदर्भात पोलिसांना विचारलं असता पोलिसांनी गैरसमज झाल्याचं सांगितलं. काल सगळीकडे जल्लोष साजरा करण्यात येत होता. त्यामुळे अचानकपणे नागरिक रस्त्यावर उतरुन भारताचा विजय साजरा करत होते. यावेळी मोठ्याने घोषणादेखील देत होते. अनेक ठिकाणी पोलीस लगेच तैनात करण्यात आले. त्यात नारायण पेठेत पोलीस पोहचले त्यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर आम्ही मध्यस्थी करुन त्यांच्यातील गैरसमज दूर केले, असंही पोलीस म्हणाले.


पुण्यात सर्वत्र जल्लोष...


भाराताचा विजय झाल्यानंतर पुण्यातील विविध परिसरात तरुणांनी जल्लोष केला. त्यात जंगली महाराज रोड आणि फर्ग्यूसन रोडवर क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. मोठमोठ्या घोषणाबाजी केली. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या जल्लोषात तरुण दंग झाल्याचं बघायला मिळालं. मात्र याच जल्लोषाचा अनेकांना त्रासही झाला. अशा वेळी जल्लोष करताना तरुणांनी सगळ्यांच गोष्टींचं भान राखणं, गरजेचं आहे आणि पोलिसांनादेखील सहकार्य करणं गरजेचं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Samriddhi Highway Accident : निष्पापांना प्राण गमवावे लागले, अपघात अत्यंत दुःखद अन् वेदनादायी; अजित पवारांकडून शोक व्यक्त