Mumbai-Pune Expressway toll rates : 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'चा (Mumbai-Pune Expressway) प्रवास आणखी महागणार आहे. कारण, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलच्या दरांमध्ये लवकरच वाढ होणार आहे. एक एप्रिल 2023 पासून द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी 18 टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. 2004 साली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार, 2023 मधील टोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी 1 एप्रिल 2020मध्ये अशीच वाढ झाली होती. मात्र 1 एप्रिल 2023 ला लागू होणारे टोलचे दर हे 2030 पर्यंत कायम असतील, असं एमएसआरडीसी कडून सांगण्यात आलं. 

पुणे- मुंबई या दोन शहरांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. त्यामुळे अनेकदा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.  वाहतूक कोंडी आणि अपघात या दोन्हीमुळे 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' कायम चर्चेचा विषय ठरतो. अनेकदा यावर प्रशासनाकडे प्रश्न विचारले जातात. मात्र त्यावर तोडगा काढला जात नाही. सुविधा पुरवल्या जात नाहीत. मात्र टोल वाढ नित्यनेमाने केली जाते. यंदा किमान सध्याच्या दरापेक्षा 50 ते 70 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 

वेग सुसाट मात्र अपघात फार -
दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा हा मार्ग सुसाट गतीने धावतो, मात्र त्याच तुलनेत या मार्गावर अपघाताची मालिकादेखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. अनेकदा मोठ-मोठ्या अपघातांमुळे या मार्गावर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकांची कुटुंब उध्वस्त झाली आहेत. मात्र तरीही योग्य सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. अपघाताचं सत्र कधी संपणार हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विचारल्या जात आहे. 

1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2030 पर्यंत पुणे-मुंबई प्रवासासाठी टोलचे दर खालीलप्रमाणे असतील -

वाहन         सध्याचे दर एक एप्रिल 2023 मध्ये किती असणार दर 
चारचाकी       270       320
टेम्पो             420       495
ट्रक               580       685
बस               797       940
थ्री एक्सेल 1380     1630
एम एक्सेल 1835   2165

ITMS च्या आधीच टोलवाढ -
आयटीएमएस म्हणजे इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम (Intelligent Transport Management System ) लागू करण्याची करण्याची घोषणा करण्यात आली आहे.  या सिस्टिमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल. या प्रणालीमध्ये ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील. त्याशिवाय अशा वाहनांना अडवण्याचे निर्देश पोलिसांना मिळतील, ज्यामुळे अशा वाहनांना अडवून संभाव्य अपघात टाळता येतील. 39  ठिकाणी वाहनांचा वेग मोजणारी यंत्रे असणार आहेत. मात्र या योजनेची अंमलबजावणी होण्याआधीच अवाजवी टोलच्या दरात वाढ केल्याने सगळीकडून टीका होत आहे. 

विनायक मेटेंच्या निधनानंतर 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' चर्चेत
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला. हा पहिलाच मृत्यू नाहीतर या आधी अनेकांनी या ठिकाणी जीव गमावला आहे. अपघात झाल्यास वाहतूक कोंडीमुळे या मर्गावर रुग्णवाहिका पोहचण्यासाठी विलंब होतो. त्यामुळे अनेकदा रुग्णांना वेळेवर उपचार करणं शक्य होत नाही. त्यामुळे मृत्यूची शक्यता जास्त असते.