Kalyan Dombivli News: रस्त्यावरील खड्डे खड्डे 72 तासात बुजविले गेलेच पाहिजेत, यासाठी लवकरच एक ॲप तयार करणार असून खड्डा पडल्यापासून 72 तासात बुजविला गेला नाही, तर त्यानंतर जे होईल त्याला तेच लोक जबाबदार राहतील. हा निर्णय केवळ सार्वजनिक बांधकाम खात्यासाठीच नव्हे तर त्याचे परिपत्रक काढून राज्यभरात लागू केले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेला कोट्यवधीचा निधी कुठे खर्च होतो. याचा विचार झालाच पाहिजे कारण जनतेच्या भावना रस्त्यासाठी चांगल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, सत्ता बदलते मात्र लोकांच्या भावनेशी खेळणे योग्य नसल्याचा टोला त्यांनी दिला. डोंबिवलीतील एका शाळेच्या खाजगी कार्यक्रमात ते बोलत होते.


डोंबिवलीतील ब्लॉसम इंटरनशनल स्कूलने तयार केलेल्या अद्ययावत ऑडीटोरीयचे उद्घाटन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सबंधित विभागाच्या अधिकऱ्यांना लक्ष केलं. डोंबिवली शहरातील रखडलेल्या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण, 6 वर्षापासून सुरु असलेला माणकोली पूल आणि 8 वर्षापासून सुरु असलेला कल्याण शिळ रोड यासारख्या प्रकल्पाकडे लक्ष वेधले. यावेळी बोलताना मंत्री चव्हाण म्हणाले की, गडकरी म्हणतात एका दिवसात 28  किलोमीटचा रस्ता तयार होतो. असं बोलतात मात्र आपल्याकडे काय होतेय याचा विचार आपण केला पाहिजे. कल्याण शीळ रोडला देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली. त्याला आठ वर्षे झाली मात्र अजूनही  कल्याण शिळ रोड तयार होत नाही. याला कोण जबाबदार आहे, याचा विचार करायला पाहिजे.


राज्यात भाजपची सत्ता असताना डोंबिवली शहरासाठी 472 कोटीचे रस्ते मंजूर करून घेत या रस्त्याचा डीपीआर तयार करत निविदा देखील काढल्या होत्या. मात्र त्यानंतर सरकार गेल्याने नंतरच्या सरकारमधल्या कोणाला तरी दुर्बुद्धी सुचली कोणाला ते माहित आहे. पण वित्तीय मान्यता असलेला निधी रद्द करण्यात आला. ज्यांनी कोणी रद्द केला त्यांचीच हा निधी पुन्हा मंजूर करण्याची जबाबदारी असल्याचे सांगत पहिल्यादा खोडले ते पुन्हा मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. प्रस्ताव पुन्हा सादर करा, असं लिहिलं पण त्याला सुद्धा एक महिना झाला आहे. यामुळेच त्यावेळी केलेले पाप आता धुवून टाका, असा उपहासात्मक सल्ला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. पुढे बोलताना ते म्हणले, कुणीतरी बोलेल की चव्हाण यांचा घरचा आहेर. मात्र ही भावना जी आहे, ती लोकांची ही कुणीतरी व्यक्त करायला हवी, असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं. दरम्यान, सरकारमधील मंत्र्यांनेच मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.