Uddhav Thackeray : एमआयएमने महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या ऑफरनंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच शिवसेना आणि भाजपमध्ये कोण किती हिंदुत्ववादी आहे, हे सांगण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. भाजपचे अनेक नेते सातत्याने शिवसेनवर टीका करत, आता सेनेत हिंदुत्व उरलं नाही, असं सांगणायचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यावरूनच आता शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपची चांगलीच शाळा घेतली आहे. शिवसेना खासदारांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, आम्ही हिंदुत्वासाठी राजकारण करत होतो. हे (भाजप) राजकारणासाठी हिंदुत्व करत आहेत.  


उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ''आम्ही भाजपाला सोडलं आहे. हिंदुस्त्वाला सोडलं नाही. सत्ता असो वा नसो आम्ही आमचं हिंदुत्व सोडणार नाही.'' ते म्हणाले, भाजपने स्वतः काही केले नाही. म्हणून दुसरा किती वाईट आहे. हे ते दाखून देण्याचा प्रयत्न करतात. उत्तर प्रदेश तुम्ही जिंकले मात्र तुमच्या जागा कमी झाल्या, असं देखील ते म्हणाले आहेत. तसेच हिंदुत्व धोक्यात आहे, असं चित्र भाजपकडून उभं केलं जात आहे. 


आरएसएस मुस्लिम संघ म्हणायचं का? 


उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोहन भागवत यांचं नाव घेत भाजवर हल्लाबोल केला. ते म्हणाले आहेत की, ''मोहन भागवत यांनी लिहिलं आहे की, सावकार मुस्लिमांचे शत्रू नव्हते. तर त्यांनी उर्दूत गजल लिहिल्या आहेत.'' संघ मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये शाखा सुरू करणार असल्याची बातमी वाचत त्यांनी भाजपाला प्रश्न केला आहे की, ''आता संघाला मुस्लिम संघ म्हणायचं का? की राष्ट्रीय मुसलमान संघ म्हणायचं? मोहन भागवत यांना खान म्हणायचं का?''


भाजपला पाकिस्तान जनता पक्ष का म्हणू नये? 


''शिवसेना मुस्लिम धार्जिन म्हणत असला तर पाक धार्जिन सर्वाधिक गोष्टी कोणाच्या काळात झाल्या आहेत. भारत-पाकिस्तान बस सेवा कोणाच्या काळात सुरू झाली होती. वाजपेयी यांच्याच काळात झाली होती. त्यावेळीही पाकिस्तान आपल्याशी असाच वागत होता. त्यावेळी यावर म्हणण्यात आलं होत की, दिल मिले ना मिले हात तो मिलाईये'', असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते म्हणाले, न बोलावता नवाब शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक खाण्यासाठी पाकिस्तानात जाणारे आमचे पंतप्रधान मोदी. पाकिस्तानात गेल्यानंतर जीनांच्या थडग्यावर नतमस्तक कोण झालं होत. हे सर्व पाहिल्यानंतर आज आम्ही त्यांना भाजप म्हणत आहोत. हे सर्व पाहता भाजपला पाकिस्तान जनता पक्ष का म्हणू नये? असं ते म्हणाले आहेत.