जालना : राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून 20 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. तर, राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल 23 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून राजकीय गाठीभेटी व दौरेही सुरू झाले आहेत. दोनच दिवसांपूर्वी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांनी बीड जिल्ह्यातील नारायणगडावर दसरा मेळावा घेऊन राज्य सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर, आता विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच, त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. दुसरीकडे निवणुकांची घोषणा होताच एमआयएमचे महाराष्ट्रातील नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz jalil) यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत राजकीय व सामाजिक चर्चा झाल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. तर, भाजपने मराठा समाजाचं आंदोलन दडपण्याचा दिल्लीतून प्रयत्न केला, असा गंभीर आरोपही जलील यांनी केला आहे. 


भेटीनंतर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमची खूप दिवसांनी भेट झाली असून सध्या दुसरी काय चर्चा होणार आहे. आमच्यात सामाजिक व राजकीय चर्चा झाली असून पुढील 2 ते 3 दिवसांत आम्ही ते जाहीर करूय. सामान्य माणसांसाठी काहीही होऊ शकतं, सामान्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राजकारणात काहीही होऊ शकतं, असेही जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. तसेच, मनोज जरांगे पाटील यांनी सर्वच समाजाला सोबत घेऊन जाण्याचं पूर्वीपासूनच म्हटलं आहे, त्यांनी सर्वच समाजाला आपलंस मानलं आहे. 2024 ची विधानसभा निवडणूक ही याच मुद्द्यावर असणार आहे. महाराष्ट्राला सर्वात जास्त आवश्यकता आहे ती, सोशल इंजिनिअरींगची. त्यामुळे, यंदाची निवडणूक ही सर्वच जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन आपण सर्वजण एक आहोत, मी महाराष्ट्रीय असल्याचा मला अभिमान आहे, भारतीय असल्याचा गर्व आहे, असे म्हणत लढली पाहिजे, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.  


सामाजिक व राजकीय विषयावर चर्चा


मनोज जरांगे पाटील यांची मी रुग्णालयात जाऊन दोनवेळा भेट घेतली होती, जेव्हा त्यांचं आंदोलन सुरू झालं होतं, तेव्हाही मी एक गोष्ट सांगितलं होती. एक मराठा लाख मराठा हे सत्य झालं आहे, मी जरांगे पाटील यांचा फॅन आहे, कारण एक छोटासा गावातला माणूस आपल्या समाजाच्या हितासाठी मैदानात प्रामाणिकपणे उतरतो, तेव्हा संपूर्ण समाज त्याच्या पाठीशी येतो, याचे उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून काही उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत, त्याअनुषंगाने व सामाजिक विषयावर माझी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. पुढील काही दिवसांत आमच्यातील भेटीबाबत काही निर्णय होईल. 


दिल्लीतून मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न


सध्याचे जे सत्ताधारी आहेत, प्रस्थापित आहेत, त्यांच्यावरील लोकांचा विश्वास उडाला आहे. राजकारणात मोठी घराणेशाही आहे, त्यामुळे आम्ही जरांगे पाटील यांना पूर्णपणे साथ देणार आहोत, असेही जलील यांनी म्हटले. माझ्या समाजासोबत न्याय व्हावा, अशी जरांगे पाटील यांची इच्छा आणि उद्देश आहे. त्यामुळे, त्यांच्याकडून प्रस्थापितांना इशारा देण्यात येत आहे, म्हणून सर्वजण येऊन त्यांची भेट घेत आहेत. भाजपची नीती लोकांना समजून आलीय, नरेंद्र मोदींनी येथील एका बड्या नेत्याला बोलावून मराठा आंदोलन दिल्लीत पोहचलं नाही पाहिजे, असे म्हटल होते. मात्र, आता ते सगळं एक्सपोज होत आहे, लोकांना सगळं समजलंय की ही भाजप व त्यांच्या खालून वरपर्यंतच्या नेत्यांचे कारस्थान आहे, असेही जलील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. 


सरकारने आता आशा संपवली - जरांगे 


मराठ्यांची दखल घेण्याऐवजी त्यांना बेदखल करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य बेचिराख करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. आमची आयुष्य उध्दवस्त करण्याचं काम सरकारने केलं आहे, ज्या मराठ्यांनी त्यांना सत्तेत बसवलं त्यांना बेचिराख करण्याचं काम केलं आहे. यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सत्तेचा वापर केला. अशा गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर या बांधवांना जी अपेक्षा होती, सरकार आपल्या लेकरांना शंभर टक्के आरक्षण देईल, मराठ्यांच्या लेकरांचे मुडदे पाडून पापाचा वाटेकरी हे सरकार कधीच होणार नाही. ही आशा होती, ती आशी सरकारने संपवली असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.  


हेही वाचा


पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम