मुंबई: पाच कोटींचा घोटाळा केला की त्याला बाजूला ठेवलं जातंय आणि 70 हजार कोटींचा घोटाळा केला की उपमुख्यमंत्रिपद दिलं जातंय, भाजपमध्ये घोटाळा जेवढा मोठा तेवढा मान मोठा अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. दिल्लीतून फोन आला की यांची दाढी चराचरा करते, मुलाची उमेदवारीही हे जाहीर करू शकत नाहीत अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केली. उद्धव ठाकरे हे पालघरमध्ये भारती कामडींच्या (Palghar Bharti Kamadi) प्रचारार्थ बोलत होते. 

Continues below advertisement


खिचडी घोटाळ्याचा आरोप असलेल्या कंपनीचा मालक शिंदे गटात


उद्धव ठाकरे म्हणाले की, विरोधकांच्या मागे ईडी,  सीबीआय लावायचं आणि त्यांना त्रास द्यायचं काम हे भाजपकडून केलं जातंय. अमोल किर्तीकरची उमेदवारी जाहीर झाली आणि दुसऱ्या दिवशी त्याला ईडीची नोटीस आली. पण ज्या खिचडी घोटाळ्याचा त्याच्यावर आरोप केला जातोय त्यासंबंधित कंपनीचा मालक आता शिंदे गटात आहे, तो मोकळा फिरतोय. पण त्यामध्ये काम करणारे तुरुंगात पाठवले जातात. 


खिचडी घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या भाजपने कोरोना काळात पीएम केअर फंड गोळा केला होता, त्याचं पुढे काय झालं याचं उत्तर द्यावं. तसेच भाजपने इलेक्टोरल बाँडच्या पैशाचा हिशोब द्यावा असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं. 


महाराष्ट्रात मोदींच नाणं चालणार नाही, इथे फक्त ठाकरे आणि पवारांचं नाणं चालणार असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपने ज्यांच्यावर आरोप केली त्यांना आपल्यासोबत घेऊन पदं दिली, उमेदवाऱ्या दिल्या, ओरिजनल भाजपवाला आता सतरंज्या उचलत आहेत असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. 


कोणत्याही परिस्थितीत वाढवण बंदर होऊ देणार नाही


आपण सत्तेत आलो तर कोणत्याही परिस्थितीत वाढवण बंदर होऊ देणार नाही असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं. ते म्हणाले की, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला शिवसेनाप्रमुखांनी हा विषय संपवून टाकला होता. आता तो पुन्हा जिवंत कोणी केला हे तुम्हाला माहिती आहे .भाजपवाले जर वाढवण प्रकल्प राबवणारच असतील तर त्यांनी ते करून दाखवावं, मी बघतो त्यांचं काय करायचं ते. जीव गेला तरी चालेल पण वाढवण बंदर नको अशी स्थानिकांची भूमिका आहे. जनतेला विश्वासात न घेता प्रकल्प राबविणार असाल तर राबवून दाखवा, तुमच्यावर बुलडोझर फिरवू . रावण अहंकारी होता पण तो विद्वान होता असं भागवत म्हणतात. पण तुम्ही सत्तेत बसवलेले विद्वान नाहीत, ते फक्त अहंकारी आहेत.


आम्हाला नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डीग्री आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. 


ही बातमी वाचा: