Uddhav Thackeray : पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर सैनिक पाहिजे ते दिल्लीत आहेत, त्यांचे आई वडील शेतकरी आहेत. त्यांना रोखतात, मोठी भिंत लावतात. खिळे टाकतात. ज्या मातीत सोनं उगवतात त्याच मातीत शेतकऱ्यांनी सरकारला गाडावे, अशी घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे.  श्रीरामपूर येथे ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते.  


उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या आठवड्यापासून मी कुटूंब संवाद करत आहेत. मी माझ्या कुटूंबाला भेटण्यासाठी आलो. मुख्यमंत्री असताना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत होतो. आता त्या कुटुंबाशी भेटायला आलो. आता कोरोना नाही पण नवीन व्हायरस आहे. हुकूमशाहीचा, हात धुवा आणि हा व्हायरसचा घालवा, असे ते म्हणाले. 


एक भ्रष्टाचारी भाजपमध्ये आला हा भाजपलाच धक्का


आज एक भ्रष्टाचारी भाजपमध्ये आला हा भाजपलाच धक्का आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नाही. शिवसेनेला धक्का नाही बसला, असे धक्के आम्ही अनेक पचवले आहेत. सडलेले पान झडली गेली आणि नवी कोंब फुटतात. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि खासदारकी, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्रीपद द्यायचे हीच मोदी गॅरंटी आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. 


दुष्काळात चव्हाणांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी ते मोदींच्या दारात गेले


अवकाळीचा फटका बसला. दुष्काळात अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी ते मोदींच्या दारात गेले. मोदी 10 वर्षांपासून स्वप्न बघत आहेत. मोदी 3 तास झोपतात. त्यांना स्वप्न पडतात कधी? तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची भाजपची ताकद नाही का? नालायक लोक आहेत. तुमच्या पक्षात म्हणून दुसरे पक्ष फोडावे लागतात का? माझी शिवसेना फोडली, नितीश कुमार, अशोक चव्हाण फोडले. दिल्लीच्या वेशीवर धुमशान चालू आहे आपल्या, दिल्लीच्या शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. ज्यांच्या जोरावर मोदी पंतप्रधान झाले, त्याच्या घरी जातात मग ते शेतकरी तुमच्या घरी आलेत तर चालत नाही का? असेही ते म्हणाले.


शेतकऱ्यांनी सरकारला गाडावं


पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर सैनिक पाहिजे ते दिल्लीत आहेत, त्यांचे आई वडील शेतकरी आहेत. त्यांना रोखतात, मोठी भिंत लावतात. खिळे टाकतात. ज्या मातीत सोनं उगवतात त्याच मातीत शेतकऱ्यांनी यांना गाडले पाहिजे. मोदी धान्य नाही पिकवत.  फडणवीस यांना काय बोलावे फरक पडत नाही. फडतूस बोलले, नालायक बोललो, काही फरक पडत नाही. निर्लज्जम सदादुखी आहेत. पाव मुख्यमंत्री आहे तरीही काही वाटत नाही.  मिंध्याला मुख्यमंत्री बनवले, जे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे ते विचार करत असतील कोणासाठी काम करतोय या उपऱ्यासाठी का? अशी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. 


जे भेकड, घाबरट असतील त्यांनी भाकड जनता पार्टीत जा


मोदी सारखे महाराष्ट्रात येत आहेत. 19 तारखेला शिवनेरीवर येताय असे ऐकतो आहोत. कोस्टल रोडचे माझे स्वप्न होते, कोणीतरी उद्घाटन करतंय, आम्ही जळणारे नाही. पंतप्रधान उद्घाटन करत आहेत याचा अभिमान आहे. मुंबईमधील डायमंड मार्केट गुजरात, फिल्मफेअर गुजरातला मी मनकी बात नाही, जन की बात करण्यासाठी आलोय. पंतप्रधान येऊन काही बोलले तरी तुम्ही भुलणार नाही. जे भेकड, घाबरट असतील त्यांनी इथुन निघून जा. भाकड जनता पार्टीत जा. मी तुमच्यासाठी नाही जनतेसाठी मैदानात उतरलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 


आणखी वाचा 


Sanjay Raut : सर्व भ्रष्ट लोक घ्यायचे, तुमचा पक्ष कुठय? भाजपची भ्रष्ट काँग्रेस झाली; संजय राऊतांचा हल्लाबोल