मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मिळालेल्या मतांचा अभ्यास केला तर एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट डबल आहे. शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनाच खरी शिवसेना मानत आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले होते. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला आहे. 


प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. शिवसेनेची (Shiv Sena) पारंपरिक मतं एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसैनिक आणि शिवसेनेच्या मतदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. शिवसैनिक एकनाथ शिंदेंनाच खरे शिवसेनाप्रमुख मानत आहेत. शिवसेनेची मतं एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट वाढल्याचे आपण पाहत आहोत. मात्र उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट आरक्षणवादी लोक आणि मुस्लिमांमुळे वाढल्याचे त्यांनी म्हटले होते.   


सुषमा अंधारेंचा प्रकाश आंबेडकरांना टोला 


आता प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावरून सुषमा अंधारेंनी एक्स या समाज माध्यमावरून त्यांना टोला लगावला आहे. सुषमा अंधारेंनी म्हटलंय की, स्ट्राईक रेटसारखे शब्द वापरून शिवसेना पक्षाची मालकी कुणाची हे ठरत असेल तर मग आरपीआय चळवळीचा एकमेव माणूस सातत्याने खासदार आणि मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या वतीने दिल्लीच्या राजकारणात आहे. याचा अर्थ नेतृत्व फक्त आणि फक्त आठवले साहेबच करू शकतात, असा टोला सुषमा अंधारेंनी प्रकाश आंबेडकरांना लगावला आहे. 


संजय राऊतांचे प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर


प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीदेखील त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.  संजय राऊत यांनी म्हटले आहे की, प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहेत. त्यांनी तो वारसा चालवला पाहिजे. त्यांना शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचा वाटत असेल तर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. रामदास आठवले यांचा देखील पक्ष आहे. काही पक्ष अचानक तयार होतात आणि नंतरच्या काळात काही लोक त्यांना चालवतात, असे प्रत्युत्तर राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना दिले आहे. 


आणखी वाचा


मराठा, कुणबी दरोडेखोर आहेत का? बच्चू कडूंच्या प्रश्नाला प्रकाश आंबेडकरांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...