Sushilkumar Shinde on BJP : सोलापूर : निवडणूक रोखे (Election Bonds) प्रकरणात सर्वांच्या न्यायालयानं सरकार आणि भाजपचे (BJP) कपडे फाडलेत, उघडं करून टाकलं आहे, असा घणाघात काँग्रेस (Congress) नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी केला आहे. मंगळवारी सुशिलकुमार शिंदे पंढरपूर येथील कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरासाठी आले होते. ते माध्यमांच्या समोर बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना सर्व प्रश्नाला दिलखुलास उत्तरं दिली.


सध्या सुरु असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते पाटील यांच्या भूमिकेबद्दल बोलताना ते हाती तुतारी घेतील का? याबद्दल काही सांगता येत नसलं तरी त्या बिचाऱ्याची सध्या खूपच अडचण झाल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं आहे. 


वंचित नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत ताणते आणि शेवटच्या क्षणाला भूमिका जाहीर करते, असा टोला यावेळी सुशिलकुमार शिंदेंनी लगावला आहे. वंचितांच्या सोलापूर लोकसभेत पाठिंबा दिला तरी ठीक आणि नाही दिला तरी ठीक आहे. आम्ही काही पाठिंबा मागत नसल्याचा टोलाही सुशिलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला आहे.


माझ्या लेकीला प्रणिती शिंदेला भाजपमध्ये घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू : सुशिलकुमार शिंदे 


प्रणितीला भाजपमध्ये घेण्यासाठी अनेकांनी अनेकांच्या मार्फत प्रयत्न केला. मात्र ती आपल्या पक्षाशी आणि विचारांशी प्रामाणिक असल्यानं ती भाजपमध्ये जाण्यास तयार नसल्याचं शिंदे यांनी सांगितलं आहे. आता 83 वयात निवडणूक लढणं योग्य नसल्यानं जोपर्यंत शक्य होतं, तोपर्यंत लढलो आणि नंतर निवडणूक न लढण्याचं ठरवलं होतं. शेवटी लोकांनी हाकलून देईपर्यंत वाट पाहायची, असंही शिंदे यावेळी बोलताना म्हणाले आहेत. 


सोलापूर लोकसभेसाठी भाजप आमदार विजय देशमुख यांना तिकीट देण्यासाठी भाजप तयार आहे. मात्र, ते हुशार आहेत, ते घ्यायला तयार नसल्याचं शिंदे यांनी सांगितलं. देशमुख हे सिद्धरामेश्वर मंदिराचे मानकरी आहेत. त्यामुळे ते खोट्या दाखल्यावर उभे राहणार नाहीत, असं सांगत पूर्वी ज्यानं बोगस दाखला घेतला, ते अजून भोगत आहेत, असा टोला सोलापूरचे विद्यमान खासदार सिद्धेश्वर स्वामी यांनाही सुशिलकुमार शिंदे यांनी लगावला आहे. सोलापुरात अजूनही भाजपाला उमेदवार मिळत नाही, याचाच अर्थ 400 पारच्या गप्पा मारणाऱ्या भाजपचा आत्मविश्वास संपला असून त्यांचा आता त्यांचे कार्यकर्ते आणि नेत्यांवरही विश्वास राहिला नसल्यानं उमेदवार शोधासाठी धावपळ करावी लागत असल्याचा टोला लगावलाही यावेळी बोलताना सुशिलकुमार शिंदे यांनी लगावला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Madha Lok Sabha: मोहिते पाटलांची माढ्यात दणक्यात प्रचाराला सुरुवात; पश्चिम महाराष्ट्रात भाजपाची डोकेदुखी वाढणार?