Supriya Sule Speech : बहिणीचं नातं आमच्या भावाला कळलंचं नाही. प्रेमात पैसे आले की ते नातं होतं नाही. प्रेमात आणि व्यवसायामध्ये माझ्या भावांनी गल्लत केली. बहिणीचं नातं हे 1500 रुपयात विकत घेता येत नाही. त्यांचं नातं फक्त मताशी जोडलेलं असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महायुती सरकारवर (Mahayuti Government) केली आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) महामेळाव्यातून त्या बोलत होत्या.


सुप्रिया सुळे म्हणाल्या की,  मी जाहीरपणे उद्धव ठाकरे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांचे मनःपूर्वक आभार मानते. लोकसभेला आपण आम्हाला जी काही मदत केली त्यामुळे आम्ही सगळे जे निवडून आलो आहोत. त्यात प्रत्येक पक्षाचे खूप मोठे योगदान आहे. आज जेव्हा पार्लमेंटमध्ये आम्ही बसतो तेव्हा सर्वात मोठा आवाज संसदेत महाविकास आघाडीकडून कोणाचा असतो तर तो वर्षाताई यांचा असतो. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. 


दिल्लीतलं वातावरण खूप बदललंय 


पत्रकार मला अनेक वेळा विचारतात की, दिल्ली कशी आहे? मी म्हणते, दिल्ली की हवा बहुत बदल गई है. कारण आम्ही जरी विरोधात असलो तरी आम्ही असे वागतो जसं आम्हीच सत्तेत आहोत. जे शपथ घेऊन सत्तेत बसलेले आहेत ते हारून मंत्री झाल्यासारखे दु:खी होऊन बसतात. त्यामुळे दिल्लीतले वातावरण खूप बदलले आहे. आता आपल्याला महाराष्ट्र वातावरण बदलायचे आहे. नुसते वातावरण नाही तर सरकार बदलायचे आहे. ही मोठी जबाबदारी आपल्याला सर्वांना पार पाडायची आहे.  


सेना आणि काँग्रेस पक्ष आमच्या पाठीशी उभे राहिले


मी विनंती करते की, तुम्ही जो काही निर्णय घ्याल? कोणाला तिकीट द्यायचे ते द्या. पण, लवकरात लवकर जागावाटप निश्चित करा, असे आवाहन त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार यांना केले. सर्वांच्याच यात्रा सुरू झालेल्या आहेत. यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मी आणि अमोल दादा ज्या दिवशी निवडून आलो. तेव्हा आमच्याकडे काहीच राहिले नव्हते. तरी आम्ही प्रचार केला. अडचणी आणि संघर्षाच्या काळात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष आमच्या बाजूने उभा राहिला त्याला आम्ही कधीच विसरणार नाही. आत्ता जेव्हा प्रचाराची वेळ आहे तेव्हा 31 खासदारांच्या वतीने मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छिते की, कष्टांची परिकाष्टा जी तुम्ही आमच्यासाठी केली त्यापेक्षा 31 खासदार मिळून आम्ही जास्त कष्ट करू आणि जास्तीत जास्त आमदार निवडून येण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.


बहिणीचं नातं आमच्या भावाला कळलंचं नाही हो


अनेक योजना सरकार राबवत आहे. लोकसभेपर्यंत कोणालाच त्यांच्या बहीण आठवल्या नाहीत. निकालानंतरच त्यांना बहिणी आठवल्या. दुर्दैव म्हणजे बहिणीचे नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही. त्यांनी प्रेम आणि व्यवसायातच गल्लत केली. प्रेमात व्यवसाय आणि पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसते. जर प्रेमात पैसे आले तर त्याला नातं म्हणता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे दुर्दैव आहे की, त्यांना व्यवसाय आणि प्रेमातले अंतर कळले नाही. ते म्हणतात की, एक बहीण गेली तरी हरकत नाही दुसऱ्या बहिणी आणू. पंधराशे रुपयाला या राज्यातलं नातं बिकाऊ नाही? हा आमच्या नात्याचा अपमान आहे. निरागस असणारा बहिण भावाच्या प्रेमाला किंमत लावायचे पाप या महाराष्ट्राच्या सरकारने केले आहे. यांचे नातं फक्त मताशी जोडलेले आहे. एकातरी लाडक्या बहिणीचे पैसे परत घेऊन बघा! गलिच्छ राजकारणात नातं येईल, असा कधी वाटलं नव्हतं, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. 


आपण पुन्हा आपलं सरकार आपलं आणू


त्या पुढे म्हणाल्या की, शहाण्यांनी कोर्टाची पायरी कधीच चढू नका. ही लढाई मशाल किंवा तुतारीची नाही तर तत्वाची लढाई आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारी आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना दुखविण्याचा कामे या लोकांनी केलं आहे. उद्धवजी बहीण म्हणून मी तुम्हाला शब्द देते, सर्वोच्च न्यायलायची लढाई आम्ही अर्धवट सोडणार नाही. उद्धवजी प्रेमाचे नातं कधीही तुटणार नाही. सेना ही कधीही वेगळी आहे हे असा वाटलं नाही. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण काम केले आहे. आपण पुन्हा आपलं सरकार आपलं आणू, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटले आहे. 


आणखी वाचा


Jayant Patil: 'अजित पवार तसे नव्हते पण...', महायुतीच्या बैठकीत शिंदे अन् पवार यांच्या धुसफुसीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया